Kolhapur News : खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी 15 अंगणवाड्या दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकार आणि भागीरथी संस्था यांच्यामध्ये महिला व बालविकास खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. अंगणवाडी बळकटीकरणासाठी 'अंगणवाडी दत्तक' योजना राबविली जात आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते. राज्यभरातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी विविध सामाजिक संस्था, उद्योगपती पुढे येत आहेत. 


अंगणवाडी दत्तक घेण्याच्या निर्णयानंतर विश्वराज महाडिक यांनी सांगितले की, भागीरथी संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. आता अजून एका उपक्रमाची भर पडली आहे. दत्तक घेतलेल्या अंगणवाडी स्मार्ट बनवण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे. कारण ग्रामीण भागातील मुलं शिकली, तर राज्याच्या आणि देशाच्या प्रगती भर पडणार आहे. महाराष्ट्र सरकारचा हा अतिशय चांगला उपक्रम आहे, इतरांनी सुद्धा समोर यावे असे आवाहन करतो.


दरम्यान, दत्तक घेतलेल्या अंगणवाड्यांचा भौतिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक सुविधांसाठी येणारा सर्व खर्च विश्वराज महाडिक आणि भागीरथी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे या अंगणवाडी केंद्राचा आदर्श व विकासात्मक कायापालट होणार आहे. अंगणवाडीतील लाभार्थ्यांना पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य व आहार शिक्षण या सुविधा चांगल्या पद्धतीने पुरवल्या जाणार आहेत. 


भागीरथी संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती


भागीरथी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहे. अरुंधती महाडिक यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, महिलांसाठी विविध कार्यशाळा घेण्यात येतात. 15 अंगणवाडी दत्तक घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण देण्यात येणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या