Bhogawati Sakhar Karkhana : कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती साखर कारखान्यासह राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखाने आणि संस्थांच्या निवडणुका अखेर पुढे ढकलल्या आहेत. पावसाळ्यामुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळे राज्यातील 82 हजार 631 संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. जिल्ह्यातील ब्रिदी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पावसाळ्याचे कारण सांगून लांबणीवर पडली असतानाच भोगावती सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय भुवया उंचावल्या होत्या. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डाॅ. पी. एल. खंडागळे यांनी कारखाना निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. 


भोगावती कारखान्याच्या (Bhogawati Sakhar Karkhana) कार्यक्षेत्रामध्ये होणारी अतिवृष्टी आणि पूरस्थिती विचारात घेता ही निवडणूक लांबण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण थेट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामुळे जुलै महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा दणका पाहता आणि राधानगरी आणि करवीर तालुक्यातील परिस्थिती पाहता सभासदांची आणि नेत्यांची मोठीच कसरत होणार होती. 


दुसरीकडे, 250 पेक्षा कमी सभासद संख्या वगळून राज्यातील 82 हजार 631 पैकी 49 हजार 333 सहकारी संस्थांच्या प्रारुप याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तर 48 हजार 667 संस्थांच्या अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यापैकी 42 हजार 157 संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर 6510 संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे, अशा सर्व संस्थांची निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर थांबवण्यात येत आहे.


दरम्यान, भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या (Bhogawati Sakhar Karkhana) निवडणुकीसाठी प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांकडून हरकत घेण्यात आली होती. याबातची सुनावणी झाल्यानंतर हरकती फेटाळून अंतिम यादी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये राधानगरी आणि करवीर तालुक्यातील 27 हजार 561 मतदार पात्र ठरले आहेत. यामध्ये राधानगरी तालुक्यातील 14 हजार 255 अ वर्ग तर 277 ब वर्ग असे 14 हजार 532 सभासद आहेत. तर करवीर तालुक्यातील 12 हजार 810 अ वर्ग, 217 ब वर्ग तर व्यक्ती सभासद 2 असे 13 हजार 29 सभासद पात्र आहेत.


'बिद्री' कारखान्याची सुनावणी चौथ्यांदा लांबणीवर


दुसरीकडे, बिद्री साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी उच्च न्यायालयात झाली होती. सुनावणीवेळी सत्ताधारी आणि विरोधी गटाचे तसेच सरकारचे वकील यांनी आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडले. परंतु संध्याकाळी वेळेत युक्तिवाद पूर्ण होऊ न शकल्याने सुनावणी तहकूब करण्यात आली. आता उर्वरित सुनावणी येत्या सोमवारी 3 जुलै रोजी होणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या