Kolhapur Heavy Rainfall : कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने रौद्ररुप दाखवल्याने बळीराजाच्या तोंडातील घास हिरावला गेला आहे. सलग आठवडाभर पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील ढगफुटीसदृश्य पावसाने पिकांची नासाडी करून टाकली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला आहे.  


कोल्हापूर कृषी विभागाने केलेल्या पाहणीनुसार अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने हातकणंगले तालुक्यात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण 989 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 670 हेक्टरवरील सोयाबीन, 54 हेक्टरवरील भात आणि 68 हेक्टरवरील भाजीपाला यांचा समावेश आहे.


कृषी विभागातील मुकुंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही नुकसानीचा अहवाल राज्य सरकारला भरपाईसाठी पाठवत आहोत. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक शेतकरी शेतातील पाणी काढून पिके वाचवू शकतात. तथापि, पावसामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस


ऑक्टोबर महिना कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ज्या ठिकाणी  पाऊस कमी होणे अपेक्षित असताना तब्बल 129.2 मिमी पाऊस झाला.  विशेष आजवरची आकडेवारी पाहिल्यास हाच पाऊस 60 मिमीच्या वर पडत नव्हता. 


गगनबावडा, शिरोळ, पन्हाळा, हातकणंगले तालुक्यात कहर


दरम्यान, परतीच्या पावसाने सर्वाधिक कहर जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये झाला. यामध्ये गगनबावडा, पन्हाळा, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांचा समावेश आहे. गगनबावडा तालुक्यात 282.9 मिमी पाऊस झाला. हातकणंगले तालुक्यात 205 मिमी पाऊस झाला. शिरोळमध्ये 143.9 मिमी पाऊस झाला. पन्हाळा तालुक्यात 163.4 मिमी पाऊस झाला. 


दरम्यान, शुक्रवारी रात्री परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर कोयना धरणातून विसर्ग सुरु आहे.  कोयना धरणाचे दोन वक्री दरजाजे शनिवारी सकाळी उचलण्यात आल्याने 3,154 क्युसेक विसर्ग सुरू झाला. पॉवरहाऊसमधूनही विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून एकूण विसर्ग 4,204 क्युसेक आहे. मात्र, रविवारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नाही. पाऊस आणखी कमी होत राहिल्यास सोमवारी सकाळी धरणातून होणारा विसर्ग बंद होण्याची शक्यता आहे. सध्या धरणात 104.82 टीएमसी पाणीसाठा आहे.


इतर महत्वाच्या बातम्या