Aaditya Thackeray in Kolhapur : आदित्य ठाकरे यांचे कोल्हापुरात थेट शिवसैनिकांमध्ये मिसळून भाषण! बंडखोरांवर कडाडून हल्लाबोल
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर युवानसेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बंडखोराच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढत आहेत. त्यांची आज शिवसंवाद यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली आहे.

Aaditya Thackeray in Kolhapur : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर युवानसेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बंडखोराच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढत आहेत. त्यांची आज शिवसंवाद यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली. त्यांच्या शिवसंवाद यात्रेचे आजरा तालुक्यात जल्लोषी स्वागत करण्यात आल्यानंतर आले. आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बंडखोर शिवसेना आमदार आणि खासदारांवर चांगलाच हल्ला चढवला. त्यांना महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे असतील, आम्हाला एकटे पाडायचं असेल किंवा ठाकरे परिवार संपवायचा असेल, पण कधीच शक्य नसल्याचे आदित्य यांनी निक्षून सांगितले. आदित्य यांनीस्टेजवरून उतरून भाषण केल्याने शिवसैनिकांमध्ये चांगलाच उत्साह संचारला.
आदित्य ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात जय महाराष्ट्र म्हणत केली. आदित्य ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने त्यांनी थेट स्टेजवरून खाली उतरून भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, कोल्हापूरमध्ये माझं जोरदार स्वागत झालं. हे गद्दार आहेत आणि गद्दारच आहेत, त्यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा, त्यांची भूक काही भागलेली नाही. त्यांची भूक वाढतच चालली आहे. माझ्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा द्वेष नाही. मी कुठल्याही प्रकारे चोरी केलेली नाही. गद्दारी केलेली नाही, त्यामुळेच मी तुमच्यासमोर उभा आहे. ते म्हणाले की, मी समजू शकतो तुम्ही का गेला आहात, तुमच्यावर दबाव पण असू शकतो.
हिंमत असेल, तर तुम्ही राजीनामा द्या
ते पुढे म्हणाले की, गद्दारी करून गेलाच आहात, तर तुम्ही आनंदी राहा, सुखी राहा पण तुमच्या हिंमत असेल, तर तुम्ही राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असे त्यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीला सामोरे जाण्याची तुमची हिंमत आहे का? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. आपल्या हिंदुस्थानामध्ये सत्यमेव जयते म्हटले जाते, सत्तामेव जयते नाही.
आदित्य ठाकरे गद्दारांमध्ये दोन गट असल्याचे ते म्हणाले. एका गटामध्ये सत्तेची भूक आहे, गद्दारी आहे, राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, तर दुसर्या बाजूला फसवून नेले आहेत असे ते यावेळी म्हणाले. जर त्यांना असं वाटत असेल की आपण शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खुपसला असं वाटत असेल तर तुमच्यासाठी आजही मातोश्री दरवाजे खुले असल्याचेही त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा आपले कुटुंबप्रमुख आहेत असे प्रत्येकाला वाटत होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन होताच सहाशे कोटीचा निधी रायगडला दिला.त्यानंतर शेवटचा निर्णय औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हे सर्व होत असतानाच त्यांनी गद्दारी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोठेही जातीमध्ये दंगली घडल्या नाहीत. कुठे वाद निर्माण झाले नाहीत. असे मुख्यमंत्री सर्वांना सोबत घेऊन जाणारे होते. उद्धव ठाकरे असेच मोठे होत गेले, तर आपले काय होणार अशी भीती या लोकांना सतावू लागली होती, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
Before You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ






















