Jalna Crime News: जालना जिल्ह्यातील एरंडवडगावात धक्कादायक घटना समोर आली असून, शुल्लक कारणावरून चक्क एका महिलेची तिच्या मुलासह हत्या करण्यात आली आहे. शेतातील घराजवळ शौचास बसू नका, वास येतो,’ असे म्हटल्याच्या कारणावरून 10 ते 15 लोकांच्या जमावाने धारदार चाकूने भोसकून ही हत्या केली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सुमनबाई देवीलाल सिल्लोडे (45) व मुलगा मंगेश देवीलाल सिल्लोडे (25)  असे हत्या करण्यात आलेल्या आई व मुलाचा नाव आहे. 


याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या महिलेचे पती देवीलाल सिल्लोडे हे सायंकाळच्या सुमारास आपल्या घराकडे जात असताना त्यांना शेतातील घराजवळ कुणीतरी शौचास बसल्याचे दिसले. त्यामुळे ते आमच्या घराजवळ शौचास बसू नका, वास येतो असे म्हणाले. त्यांनतर काही वेळेतच तांड्यावरील महिला पुरुषांचा एका जमाव धावतच आला. काहीही बोलण्याच्या आधी सिल्लोडे कुटुंबातील सदस्यांवर हल्ला चढवत थेट लाठ्या-काठ्या, चाकूने मारहाण केली. यातच आई सुमनबाई व मुलगा मंगेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर वडील देवीलाल व छोटा मुलगा योगेश दोघे गंभीर जखमी झाले. 


पोलीस घटनास्थळी...


या घटनेची माहिती मिळताच सेवली पोलिसांनी धाव घेतली. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेत तपासाचे आदेश देत आरोपींच्या अटकेच्या सूचना दिल्या आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून इतर सहा जण पळून गेले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


वडील मुलगा गंभीर जखमी...


शुल्लक कारणावरून झालेल्या वाद एवढ्या विकोपाला गेला की, आरोपींनी हातात लाठ्या-काठ्या आणि चाकूने हल्ला चढवला. सिल्लोडे कुटुंबातील चारही सदस्यांवर एकाचवेळी जमावाने हल्ला केल्याने त्यांना तेथून पळून जाणेही अवघड झाले. ज्यात सुमनबाई आणि मंगेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर देवीलाल सिल्लोडे आणि त्यांचा दुसरा मुलगा जखमी झाला आहे. त्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.