Jalna News: मराठवाड्यात (Marathwada) झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. जालना जिल्ह्याला (Jalna District) देखील याचा मोठा फटका बसला आहे. जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहेत. जिल्ह्यातील 100 गावांतील 12 हजार 163 शेतकऱ्यांना (Farmers) अवकाळीचा फटका बसला असून,  जवळपास 15 हजार 80 हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर प्रशासनाकडून आता या नुकसानीचे पंचनामे केले जात आहे. 


एकट्या जालना जिल्ह्यात 15 हजार 80 हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाले आहेत. ज्यात 4 हजार 994 जिरायत, 7 हजार 530 बागायत आणि 2 हजार 556 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक फटका हा जाफराबाद, जालना, मंठा आणि बदनापूर तालुक्यांना बसला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आला असताना आता रब्बीच्या हंगामात अवकाळीमुळे पावसाने पिकांचे नुकसान केले आहेत. त्यामुळे आता पंचनामे करून, तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे. 


हवामान विभागाच्या अंदाजानंतर अवकाळी पावसाच्या भीतीने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी गहू, हरभऱ्याच्या पिकांची सोंगणी करून ठेवली होती. तर पिकांची सोंगणी केल्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काढणी करून ठेवलेल्या जिल्ह्यातील 316  शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यात अंबड 55 , बदनापूर 40, भोकरदन 52, घनसावंगी 39, जाफराबाद 116, जालना 10 आणि मंठा तालुक्यातील 04 शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यातील 9  हजार 127  शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली आहे.


पंचनामे करण्याचे निर्देश


दरम्यान मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना आतापर्यंत फक्त 5 टक्के पंचनामे करण्यात आले आहे. शासकीय कर्मचारी संपावर गेल्याने पंचनामे रखडले होते. सोमवारी हा संप मागे घेण्यात आल्याने तलाठी आणि मंडळ अधिकारी कामावर हजर झाले आहेत. दरम्यान सोमवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी आठही जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन 22 मार्चपर्यंत विभागातील पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. 


मराठवाड्यात 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान


मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यात एकूण 62 हजार 480 हेक्टरवरील पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटनेत सहा लोकांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत. तसेच 76 लहान-मोठी जनावरे दगावली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा आकडा 33 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Marathwada Rain Update: अवकाळीमुळे मराठवाड्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, 62 हजार 480 हेक्टर पिकांचे नुकसान