जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील हजारो शेतकरी केळी पीक विम्याचा लाभ मिळालेला नसून यात आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी आपण असे कोणतेही पत्र शासनाला दिले नसून उलट या प्रश्नासंदर्भांत लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. एकूणच केळी पीक विम्यासंदर्भात राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जात (Banana Crop) असून मात्र मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीत अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असताना शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसल्याचे एकनाथ खडसे यांचे म्हणणे आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामुळे शेतकरी लाभापासून वंचित असल्याचे खडसे म्हणाले आहेत. एकनाथ खडसे यांच्या आरोपांना चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात अनेक शेतकऱ्यांना मागील काळातील पीक विम्याची (Pik Vima) रक्कम मिळालेली नाही. या विषयावर दोन्ही नेते एकमेकावर टीका करत आहेत. 


एकनाथ खडसे म्हणाले की, जिल्ह्यात 1 लाख 10 हजार हेक्टर केळीची नोंदणी असून सॅटेलाईटच्या (Satelite Survay) माध्यमातून 32 हजार हेक्टर केळीची नोंदणी झाली आहे तर कृषी अधिकारी यांच्या सर्वेक्षणातून 52 हजार हेक्टर नोंदणी झाली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा उतरविण्यात आला आहे, त्याच्या लागवड क्षेत्रामध्ये विसंगती असल्याचं म्हटल आहे. याच विषयाला धरून आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी केळी न लावता कसा पीक विमा उतरवतो, दलाल पैसे घेऊन कसे पैसे कमवत आहेत, याची त्या वेळच्या तहसीलदारांसमवेत काही शेतकऱ्यांचं स्टिंग ऑपरेशन केले असल्याचा आरोप खडसे यांनी केला. तसेच या संपूर्ण प्रकारची चौकशी शासनाने करावी, अशी मागणी एक लेखी पत्राद्वारे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकारकडे केली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीमुळे, त्या तक्रारीची चौकशी केल्याशिवाय पुढील कारवाई केली जात नसल्याने, शेतकऱ्यांना केळी पीक विमा मिळत नसल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. 


खडसे-पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप 


दरम्यान एकनाथ खडसे यांच्या या आरोपानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, एकनाथ खडसे हे वैफल्य ग्रस्त झाले असून त्यातून ते अशा प्रकारचे आरोप करून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा साठी काम केले आहे आणि ते करत राहणार असल्याचं सांगताना 'आपण कोणते पत्र शासनाला दिले, त्याची प्रत पुरावा म्हणून सादर करावी', अस आव्हान देखील आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. एकंदरीतच शेतकरी पीक विमा योजना वरून आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्या मध्ये राजकीय संघर्ष मात्र टोकाला पोहोचला असल्याचं पाहायला मिळतं आहे. 


पीक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष 


जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, भुसावळ या भागामध्ये केळीचे उत्पादन घेतले जाते. मात्र मागील वर्षीच्या पावसात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नाही, म्हणून शेतकऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. याबाबत अनेक दावे प्रतिदावे सुरू आहेत. अनिल पाटील यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत मार्ग काढण्याचा सूचना केल्या. गिरीश महाजन यांनी देखील याबाबत वक्तव्य केले की केळी पीकविमा कंपनीशी चर्चा केली असून पीक विमा धारकांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे ते म्हणाले आहेत. मात्र आजही अनेक शेतकरी पीक विमा योजेनपासून वंचित असल्याची तक्रार एकनाथ खडसे यांनी केली आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


Crop Insurance Scam : कुठे एमआयडीसीच्या जागेवर, तर कुठे शेतच नसतानाही भरला विमा; कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पीक विमा घोटाळे