जळगाव : जळगावमधील (Jalgaon) सुप्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सची सलग दुसऱ्या दिवशीही ईडीकडून (ED) तपासणी सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. स्टेट बँकेकडून घेतलेल्या आणि थकीत असलेल्या कर्जाच्या पोटीही ईडी चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या चोवीस तासांपासून ही कारवाई सुरू असून आज पहाटे चार वाजेपर्यंत ईडी अधिकाऱ्यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्समधील (RL Jewellers) सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन करण्याचे आणि आर्थिक व्यवहार कागदपत्रांची तपासणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. 


सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातील राजमल लखीचंद (Rajaml Lakhichand Jewellers) अर्थात आर एल समूहाच्या विविध आस्थापनांवर गुरुवारी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून एकाचवेळी सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यात जळगावमधील आर एल ज्वेलर्स, मानराज आणि नेक्सा शोरूमचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी मुंबई, नागपूर (Nagpur), छत्रपती संभाजीनगर येथील साठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. या घटनेत माजी आमदार मनीष जैन (Manish Jain) यांचीही चौकशी केल्याचं समोर येत आहे. मात्र माजी खासदार ईश्वर जैन (Ishwar Jain) हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांची चौकशी करण्यात आली नसल्याचं सांगण्यात येत आहे. राजमल लखीचंद ग्रुपतर्फे ईडी अधिकाऱ्यांना जी काही माहिती आवश्यक वाटत आहे, त्याबाबत राजमल लखीचंद ग्रुपकडून पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. 


दरम्यान, गुरुवारी सायंकाळपासून ईडी पथकाने चौकशी सुरू केल्यापासून राजमल लखीचंद ग्रुपमधील सर्वांचे मोबाईल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अद्याप नेमकी माहिती शकलेली नाही. गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेली ही कारवाई आजही दिवसभर चालणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या ईडी तपासणीत काय काय हाती काय लागते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मागील काळातही सीबीआयने चौकशी केली होती. त्यावेळी काही निष्पन्न झाले का? याबाबत देखील माहिती समोर आली नाही. त्यानंतर आता या कारवाईमध्ये काय मिळते की केवळ चौकशीचा फार्स ठरतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


ईडी कारवाईमागे राजकीय हात? 


जळगावमधील राजमल लखीचंदवर ईडी कारवाई मागे राजकारण असल्याच्या राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर ईश्वर बाबूजी जैन यांचे चिरंजीव माजी विधानपरिषद आमदार मनीष जैन यांनी शरद पवार यांची साथ सोडून ते अजित पवार यांच्या पाठीशी उभी राहिले आहे. ईश्वर बाबूजी जैन हे दहा ते पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण राज्याचे खजिनदार होते. जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची जागा ही ईश्वर बापुजी जैन यांच्याच नावावर आहे. मात्र ही इमारत कर्जाच्या विळख्यात आहे. राज्याचे खजिनदार असल्या कारणाने त्यांच्याकडील महत्त्वाची कागदपत्र आणि माहिती घेण्यासाठी तर ही कारवाई केली नसावी, अशा प्रकारच्या चर्चाना उधाण आले आहे. 


कोण आहेत ईश्वरलाल जैन, मनीष जैन?


माजी खासदार ईश्वरलाल जैन हे राजमल लखीचंद ज्वेलर्स ग्रुपचे संचालक आहेत. ईश्वरलाल जैन राज्यसभेवर  2009 ते 2014 पर्यंत खासदार होते. ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादी पक्षाचे मधल्या काळात खजिनदार होते. तसेच शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती, मात्र सध्या ते राजकारणात सक्रिय नाहीत. राजमल लखीचंद ग्रुपच्या प्रॉपर्टी जळगाव, नाशिक, ठाणे या ठिकाणी असल्याचे माहिती आहे. मनीष जैन हे 2009 ते 2014 पर्यंत विधान परिषदेवर आमदार होते. एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांचा त्यांनी पराभव केला होता. सुरेशदादा जैन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते सक्रिय सदस्य असून सध्या ते अजितदादा पवार गटात आहेत. जळगाव, ठाणे, नाशिक आदी जिल्ह्यात त्यांच्या फर्म आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Jalgoan News : जळगाव, नाशिकमधील 6 फर्मवर छापेमारी, थकवलेल्या 600 कोटींच्या कर्जाची चौकशी