Today's Weather Update : देशात आता थंडीचा जोर वाढलेला पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडी आणि दाट धुके पाहायला मिळतेय, तर काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी होत आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांना थंडी आणि धुक्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 


उत्तर भारतात थंडीची लाट


भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस उत्तर भारतात दाट धुक्याची शक्यता आहे. पर्वतीय भागात सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात तापमानात गारठा वाढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात पुढील पाच दिवस थंडी आणि धुक्यातून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे, त्यामुळे वाहन चालकांना प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे. दृष्यमानता कमी झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दिल्लीतील अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या असून विमान उड्डाणेही उशिराने सुरु आहेत.


विमान आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम


दिल्लीत थंडीची लाट कायम असून मंगळवारी थंडीसह दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली. दाट धुक्यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम होत आहे, तर दुसरीकडे रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. राजधानी एक्स्प्रेससारख्या गाड्याही 15 तासांहून अधिक उशिराने धावत आहेत. पालम विमानतळावर सकाळी 7 वाजता 100 मीटर दृश्यमानता नोंदवली गेली, तर सकाळी 7:30 वाजता दृष्यमानता 0 मीटरवर घसरली होती. सफदरजंग विमानतळावर सकाळी 7 आणि 7.30 वाजता 50 मीटरपर्यंत दृश्यमानता नोंदवण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.


1000 हून अधिक विमान उड्डाणे प्रभावित


दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे गेल्या तीन दिवसांत दिल्ली विमानतळावर 1,000 हून अधिक उड्डाणे 12 तासांपेक्षा जास्त उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्ली-गोवा इंडिगो फ्लाइटला 10 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रवाशाने वैमानिकाला धक्काबुक्की केली होती.


बदलत्या हवामानाचा शेतीला फटका


यूपीसह इतर राज्यांमध्ये सध्या रब्बी पिकांचा मोसम आहे. तसेच बागायती पिकांचा विचार करता बटाटा आणि इतर भाजीपाला पिकांचे हवामानातील बदलांपासून संरक्षण करणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचं ठरत आहे. गेल्या 15 दिवसांपासून उत्तर प्रदेशातील जवळपास सर्वच भागात सुरू असलेली कडाक्याची थंडी आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील दोन-तीन दिवस राज्यात तापमान, दाट धुके आणि तुरळक पाऊस पडण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे कृषी संशोधन परिषदेने शेतकर्‍यांना प्रतिकूल हवामानापासून पिके वाचवण्यासाठी उपाय सुचवले जात आहेत.