Weather Update Today : देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


दिल्लीत यमुनेच्या पाण्याच्या पातळीत पुन्हा एकदा वाढ 


राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. हरियाणाच्या हातिनी बॅरेज कुंडातून सोडण्यात आलेले पाणी यमुनेला भितीदायक बनवत आहे. हथिनीकुंड बॅरेजमधून 2 लाख क्युसेकपेक्षा जास्त क्षमतेने पाणी सोडण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीत यमुना धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहे. रविवारी रात्री उशिरा यमुनेच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या वर जाऊन 206.44 मीटरवर गेली. त्यानंतर प्रशासनाच्या सुरक्षेसाठी 60 पथकांना सतर्क करण्यात आले आहे.


उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी कमी पाऊस झाला, परंतु असे असूनही दोन्ही राज्यांमध्ये भूस्खलनाची परिस्थिती कायम आहे. पावसामुळे हिमाचल प्रदेशातील सुमारे 700 रस्ते बंद झाले आहेत. 


उत्तर प्रदेशात असे असेल हवामान 


IMD नुसार, पुढील 24 तासांत उत्तर प्रदेशात काही ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25 जुलैपासून राज्यात मान्सून पुन्हा एकदा जोर धरणार असून 25-26 जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील 13 जिल्ह्यांतील शेकडो गावांना पुराचा फटका बसला असून गंगा यमुना आणि शारदासह अनेक नद्यांना पूर आला आहे. 


महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता 


भारतीय हवामान विभागाच्या मते, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर इतर भागात ढगाळ हवामान अपेक्षित आहे. 13 जुलैपासून नागपूर विभागात पूर आणि वीज पडून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी राज्य सरकार पूर्णत: सज्ज असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले. 


गुजरातच्या या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार


गुजरातमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. देवभूमी द्वारका, राजकोट, भावनगर आणि वलसाड जिल्ह्यांत येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडू शकतो. जुनागडमध्ये रविवारी पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सुमारे 3,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी गुजरातसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आणि सांगितले की राज्यात 24 जुलै रोजी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.