नवी दिल्ली : एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. त्यांना एकूण 785 पैकी 516 मतं मिळवली, तर यूपीएचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांना 244 मतं मिळाली.


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदीही भाजपचा चेहरा असणार आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानासाठी 14 खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे 785 पैकी 771 खासदारांनीच मतदान केलं.

संख्याबळ लक्षात घेतलं तर एनडीएचे व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्चित मानला जात होता. दोन्ही सभागृहातले मिळून 785 खासदार आहेत. मात्र सध्या लोकसभेच्या दोन तर राज्यसभेची एक जागा रिक्त आहे. शिवाय भाजपचे लोकसभा खासदार छेदी पासवान यांना एका न्यायालयाच्या निकालामुळे मतदान करता आलं नाही.

लोकसभेच्या 545 जागांपैकी भाजपकडे 281 तर एनडीएकडे 338 इतकं संख्याबळ आहे. राज्यसभेतही भाजप 58 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष बनलाय. एनडीएत नसलेले तेलंगणा राष्ट्र समिती, एआयडीएमके, वायएसआर काँग्रेस या तीनही पक्षांनी राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत एनडीएलाच मतदान केलं.

नितीश कुमार यांचा गोपाळकृष्ण गांधींना पाठिंबा

नितीशकुमार यांनी गोपाळकृष्ण गांधींना दिलेलं वचन पाळायचं ठरवलं. कारण सध्या ते भाजपसोबत असले तरी उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांनी आधीच गांधींच्या उमेदवारीचं समर्थन केलं होतं.

नितीशकुमार यांच्याप्रमाणेच राष्ट्रपतीपदाला कोविंद यांना पाठिंबा देणारा बिजू जनता दल यावेळी यूपीएच्या गोटात होता.