कानपूर : विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर आता योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठली आहे. विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने कानपूर येथे आणले होते. परंतु शुक्रवारी सकाळी पोलिसांची गाडी पलटी झाली. तिथून विकास दुबेनं पोलिसांची बंदूक हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेल्या चकमकीत तो ठार झाला. या एन्काऊंटरनंतर काही सवाल देखील उपस्थित केले जात आहेत.  कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह काही नेत्यांनी ट्वीट करत या घटनेनंतर सरकारवर टीका केली आहे.


गुन्हेगारांना सुरक्षा देणाऱ्या लोकांचं काय? - प्रियांका गांधी

गुन्हेगाराचा अंत झाला, गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना सुरक्षा देणाऱ्या लोकांचं काय? असा सवाल करत विकास दुबेच्या एन्काऊंटनंतर प्रियांका गांधींनी ट्वीट केलं आहे. काल त्यांनी या प्रकरणी ट्वीट करत कानपूर हत्याकांडाप्रकरणाच्या तपासात यूपी सरकार फेल झालं असल्याची टीका केली होती. अलर्ट असतानाही आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचला ही घटना सुरक्षाव्यवस्थेची पोलखोल तर आहेच मात्र आरोपीसोबत मिलीभगत आहे की काय? असं देखील सूचित होतंय, असं प्रियांका गांधींनी म्हटलं होतं.


सरकार पलटण्यापासून वाचवलं - अखिलेश सिंह

खरतंर ही कार पलटलेली नाही, रहस्य उलगडून सरकार पलटण्यापासून वाचवलं गेलं आहे, असं ट्वीट समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश सिंह यांनी केलंय.


 उज्जैनमध्ये सरेंडर का केलं? -रणदीप सुरजेवाला

कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे की, विकास दुबे एन्काऊंटरमध्ये मारला गेला. अनेक लोकांनी अशी शक्यता आधीच वर्तवली होती. मात्र अनेक प्रश्न आता मागे राहिलेत. सूरजेवाला म्हणाले की, जर त्याला पळूनच जायचं होतं तर त्यानं  उज्जैनमध्ये सरेंडर का केलं? त्या गुन्हेगाराजवळ अशी कोणती गुपितं होती जी सत्ता आणि सरकारशी संबंधांना उजेडात आणतील? मागील 10 दिवसातील कॉल डिटेल्स जारी का केल्या नाहीत? असा सवाल सूरजेवाला यांनी केलाय.


 तिन्ही एन्काऊंटरचा पॅटर्न एकसारखाच का?  - दिग्विजय सिंह

दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे की, ज्याची शंका होती तेच घडलं. विकास दुबेचे कोणकोणत्या राजकीय लोकांशी, पोलिस आणि अन्य सरकारी लोकांशी संपर्क होता, हे आता समोर येणार नाही. मागील 3-4 दिवसात विकास दुबेच्या 2 अन्य साथिदारांचाही एन्काऊंटर झाला होता. या तिन्ही एन्काऊंटरचा पॅटर्न एकसारखाच का आहे? असा सवाल दिग्विजय सिहांनी उपस्थित केलाय.  तसंच हे देखील माहिती करुन घेणं आवश्यक आहे की, विकास दुबेने मध्यप्रदेशचं उज्जैन महाकाल मंदिरचं सरेंडर होण्यासाठी का निवडलं? मध्यप्रदेशच्या कोणत्या प्रभावशाली व्यक्तिच्या भरवशावर तो उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काउंटरपासून वाचण्यासाठी आला होता? असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.




संबंधित बातम्या

Vikas Dubey Encounter | अटकेनंतर चौकशीदरम्यान विकास दुबेनं दिली होती खळबळजनक माहिती  

Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा एन्काऊंटर, पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना केला खात्मा 

Vikas Dubey Arrested: कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला उज्जैनमधून अटक