कानपूर : आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे चकमकीत मारला गेला आहे. त्याला उत्तर प्रदेश पोलिस कानपूरला घेऊन आले. मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटी झाली. यावेळी विकास दुबेने एका पोलिसाची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि विकास दुबेदरम्यान जोरदार चकमक झाली. या चकमकीत विकास दुबेचा खात्मा झाला. कानपूरमधील भौती परिसरात ही घटना घडली.


कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला काल अटक करण्यात आलं होतं. पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केली होती. यानंतर केल्या गेलेल्या पोलिस चौकशीत विकास दुबेनं काही खळबळजनक माहिती दिली होती. तो म्हणाला होता की, पोलिसांच्या हत्येनंतर तो त्या पोलिसांचे मृतदेह जाळू इच्छित होता. पोलिसांचे मृतदेह जाळण्यासाठी एकत्रित करण्यात आले होते. त्यासाठी तेल देखील आणले होते. विकासनं पोलिसांच्या संपर्कात असल्याचे देखील सांगितले आहे. विकास दुबे म्हटलं होतं की, आम्हाला सकाळी पोलिस येणार आहेत, याची माहिती मिळाली होती. मात्र पोलिस रात्रीच पोहोचले. आम्हाला भीती होती की, पोलिस एन्काऊंटर करतील, अशी माहिती चौकशीत विकास दुबेनं दिली होती.

Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा एन्काऊंटर, पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना केला खात्मा

विकास दुबेनं चौकशीत सांगितलं होतं की, सीओ देवेंद्र मिश्रांसोबत त्यांचं आजिबात पटत नव्हतं. अनेकदा देवेंद्र मिश्रा यांनी त्याला बघून घेतो अशी धमकी दिली होती. त्यानं सांगितलं होतं की,  सीओ (देवेंद्र मिश्रा) माझ्या विरोधात आहे. त्याला समोरच्या घरात मारलं होतं. माझ्या साथिदारांनी सीओला मारलं. घटनेनंतर त्यांना सर्व साथिदारांना वेगवेगळं पळून जाण्यास सांगितलं होतं.

Vikas Dubey Arrested: कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला उज्जैनमधून अटक

हिस्ट्रीशिटर असलेला विकास दुबे हा शिवराजपूर गावात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिस गेले असता एका इमारतीच्या छतावरुन विकास दुबे आणि त्याच्या गुंडांनी अंधाधुंद गोळीबार केला होता. यात पोलिस उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह एसओ महेश यादव, चौकी इंचार्ज अनूप कुमार, सब-इंस्पेक्टर नेबुलाल, कॉन्स्टेबल सुल्तान सिंह, राहुल, जितेंद्र आणि बबलू हे शहीद झाले होते.



काय आहे घटना?

कुख्यात गुन्हेगार विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांची 40 जणांची टीम गावात पोहोचली. त्यानंतर जे घडलं ते फक्त चित्रपटात शोभून दिसलं असतं. उत्तरप्रेदशातली कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले अशी ही घटना आहे. पोलीस पोहोचल्याचा पत्ता लागल्यावर विकास दुबे याच्या टोळीने पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यात जेसीबी लावला. त्यामुळे पोलीस पुढे वाहनाऐवजी पायी गेले. याच वेळी उंच ठिकाणी बसलेल्या विकास दुबेच्या टोळीने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात आठ पोलिसांना वीरमरण आले. विकास दुबे हा खतरनाक, कुख्यात अपराधी आहे. दुबेच्या विरोधात 50 गुन्ह्याच्या नोंदी आहेत. त्यात खून, अपहरण, खंडणी सारखी प्रकरणे आहेत. विकास दुबेनं 2001 मध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये घुसून तत्कालिक राज्यमंत्री शुक्ला यांची गोळी मारुन हत्या केली होती. विकास दुबेच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता मोठी टीम त्याला पकडण्यासाठी गेली होती.

कोण आहे विकास दुबे?

  • विकास दुबे मूळचा कानपूरजवळच्या बिकरु गावचा आहे.

  • हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी असे किमान 60 हून अधिक गुन्हे दुबेवर दाखल आहेत.

  • 2001 मध्ये तर पोलीस स्टेशनमध्ये घुसून त्यानं भाजपचे राज्यमंत्री संतोष शुक्लांची हत्या केली होती.

  • त्या प्रकरणात एकाही पोलिसाची विकास दुबेविरोधात कोर्टात साक्ष देण्याची हिंमत झाली नाही.

  • बसपाच्या काळात विकास दुबेचा दबदबा वाढला. कानपूर आणि परिसरात त्याची दहशत वाढली.

  • याच काळात सरकारी कंत्राटापासून ते शाळा-कॉलेज उभी करुन त्यानं करोडोची संपत्ती उभी केली.

  • बिकरुसह आजूबाजूच्या गावांमध्ये विकास दुबेच्या परवानगीशिवाय कुणी ग्रामपंचायतीलाही उभं राहू शकत नाही.

  • गेल्या 15 वर्षात एकदाही बिकरु गावात निवडणूक झाली नाही, शिवाय झेडपीतही दुबेच्याच कुटुंबाचा सदस्य निवडून जातो.

  • आताही विकास दुबेची पत्नी ऋचा दुबे झेडपी सदस्य आहे

  • दुबेला दोन मुलं आहेत, त्यातला एक इंग्लंडमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेतोय, तर दुसरा कानपूरमध्येच शिकतोय.