नवी दिल्ली: कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला अखेर अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केली आहे. माहितीनुसार उज्जैनच्या महाकाल मंदिरातून तो सरेंडर करणार असल्याची माहिती होती, मात्र त्याआधीच पोलिसांना ही माहिती मिळाली. मंदिरात बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. या अटकेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. महाकाल मंदिराच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांना त्याच्याबाबत माहिती दिली होती. जवळपास 10 राज्यातील पोलिस विकास दुबेला शोधत होते.


विकासच्या दोन साथीदारांचा खात्मा
आज सकाळीच पोलिसांनी एका एनकाऊंटरमध्ये विकास दुबेच्या दोन साथीदारांचा खात्मा केला होता. यात प्रभात मिश्रा आणि बउअन यांना मारले होते. हे दोघेही विकासचे अत्यंत जवळचे सहकारी होते. दोघेही कानपूर हत्याकांडात सहभागी देखील होते. प्रभातला कानपूरच्या पनकी ठाणा क्षेत्रात झालेल्या चकमकीत मारले. त्याला अटक करुन फरिदाबादवरुन रिमांडसाठी आणले जात असताना त्याने पोलिसांचे हत्यार हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा खात्मा केला. यावेळी त्याने पोलिसांवर फायरिंग देखील केली, त्यात दोन पोलिस जखमी झाले आहेत.

सरकार कुठल्याही दोषींना सोडणार नाही-  मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान 

दरम्यान, विकास दुबेच्या अटकेनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, ज्यांना वाटतं की महाकालला शरण आल्यावर त्यांची पापं धुतली जातील, त्यांनी महाकालला खऱ्या अर्थानं ओळखलंच नाहीय. आमचं सरकार कुठल्याही दोषींना सोडणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.


पाच लाखांचा इनाम 

कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला अखेर  मध्य प्रदेशात पकडलं. मात्र तीन जुलैपासून तो फरार होता. त्याची माहिती देणाऱ्याला पहिल्यांदा पोलिसांनी 50 हजारांचं बक्षीस जाहीर केलं होतं. नंतर ही रक्कम 2.5 लाख केली होती तर काल, बुधवारी त्याची माहिती देणाऱ्याला पाच लाखांचा इनाम देण्यात य़ेईल, असं सांगितलं होतं.

3 जुलै रोजी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये चित्रपटाच्या कथानकासारखी घटना घडली होती. विकास दुबे आणि गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या टीमवर गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आठ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. तर सात जण जखमी झाले आहेत. शहीदांमध्ये एक डीवायएसपी, तीन सब इन्सपेक्टर आणि चार चार हवालदारांचा समावेश आहे. पोलिसांना कुख्यात गुन्हेगार विकास दुबे एका गावात लपला असल्याची माहिती मिळाली होती.

VIDEO | Vikas Dubey Arrested | कानपूरमध्ये आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा कुख्यात गुंड विकास दुबे अखेर अटकेत


कानपूरमध्ये गुंडांच्या गोळीबारात डीएसपींसह आठ पोलीस शहीद

काय आहे घटना?

कुख्यात गुन्हेगार विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांची 40 जणांची टीम गावात पोहोचली. त्यानंतर जे घडलं ते फक्त चित्रपटात शोभून दिसलं असतं. हे दशकभरापुर्वी उत्तर प्रदेश-बिहर मध्ये राजरोस घडत असल्याची चर्चा होती. 21 व्या शतका दिवसाढवळ्या असे घडलं यावर लवकर विश्वास बसत नाही. उत्तरप्रेदशातली कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले अशी ही घटना आहे. पोलीस पोहचल्याचा पत्ता लागल्यावर विकास दुबे यांच्या टोळीने पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यात जेसीबी लावला. त्यामुळे पोलीस पुढे वाहनाऐवजी पायी गेले. याच वेळी उंच ठिकाणी बसलेल्या विकास दुबेच्या टोळीने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात आठ पोलिसांना वीरमरण आले.

विकास दुबे हा खतरनाक, कुख्यात अपराधी आहे. दुबेच्या विरोधात 50 गुन्ह्याच्या नोंदी आहेत. त्यात खुन, अपहरण, खंडणी सारखी प्रकरणे आहेत. विकास दुबेनं 2001 मध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये घुसून तत्कालिक राज्यमंत्री शुक्ला यांची गोळी मारुन हत्या केली होती. विकास दुबेच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता मोठी टीम त्याला पकडण्यासाठी गेली होती.