Rahul Gandhi Speech: भारताचा यंदाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पावर विविध स्तरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जबरदस्त टीका केली आहे. त्याच्या या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 



  1. राहुल गांधी यांनी सर्वात मोठी टीका केली ती म्हणजे या सरकारने देशातील उद्योगांमध्ये एकाधिकारशाही तयार करुन केवळ दोन उद्योजक अदानी आणि अंबानी यांना श्रीमंत केलं आहे. देशातल्या 55 कोटी लोकांकडे जेवढी संपत्ती आहे त्यापेक्षा जास्त संपत्ती ही अदानी आणि अंबानींकडे आहे, असंही ते म्हणाले.

  2. अदानी आणि अंबानीच्या संपत्तीबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले, एका व्यक्तीकडे खनिजं, तेल, वीज असं जे काही आहे नाही ते दिलं तर दुसऱ्या व्यक्तीकडे पेट्रोकेमिकल, ई-कॉमर्स, टेलिकॉम असे उद्योग देण्यात आले आहेत. हे दोन उद्योगपती म्हणजे अदानी आणि अंबानी आहेत.

  3. राहुल गांधी यांनी बरोजगारीचा महत्त्वाचा मुद्दा मांडताना मागील एका वर्षात तीन कोटी युवकांचे रोजगार हिरावले गेले असल्याची टीका केली. तसंच हे सरकार रोजगार देण्याची गोष्ट करत आहे, पण वस्तुस्थिती म्हणजे गेल्या पन्नास वर्षातील सर्वाधि बेरोजगारी सध्या देशात आहे.

  4. बेरोजगारीच्या मुद्द्यावर पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, भारतातील युवक हे सरकारकडून रोजगार मागत आहेत पण सरकार त्यांना ते देण्यास सक्षम नाही. पण केंद्र सरकारने बेरोजगारांच्या मुद्द्यावर एकही शब्द काढला नाही.

  5. युपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात आम्ही 27 कोटी लोकांना दारिद्रय रेषेतून बाहेर काढलं, तर मोदी सरकारने 23 कोटी लोकांना पुन्हा दारिद्रय रेषेत ढकललं, अशी टीका करताना राहुल गांधी यांनी त्यांच्या सरकारच्या कामाची तुलना मोदी सरकारशी केली.

  6. टीका केल्यावर केंद्र सरकारला ती सहन का होत नाही असा सवाल करताना गांधी म्हणाले, मागील सात वर्षामध्ये असंघटित क्षेत्रातील आणि लघु उद्योगातील अनेक रोजगार बुडाले. त्यामुळे 84 टक्के भारतीयांच्या उत्पन्नावर परिणाम झाला, ते अधिक गरीब झाले.

  7. शिवाय केंद्र सरकारने घेतलेले मोठे निर्णय अर्थात नोटाबंदी आणि जीएसटी याचीही चुकीची अंमलबजावणी झाली, परिणामी देशाचं नुकसान झालं, असंही ते म्हणाले. 

  8. केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे देशातील लघु उद्योगधंदे संपुष्टात येत असून असे सुरु राहिल्यास 'मेड इन इंडिया' हा उपक्रम पूर्ण होऊ शकत नाही, असंही गांधी म्हणाले

  9. तसंच मी मोठ्या उद्योगधंद्यांच्या विरोधात नाही, पण देशात रोजगार वाढीचं काम छोटे, मध्यम उद्योगधंदे अधिक करतात असं महत्त्वाचं विधान राहुल गांधी यांनी केलं 

  10. या सर्वांमुळे देशात दोन भारत तयार करण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे. एक भारत असा आहे जो खूप श्रीमंत आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांना पाणी, वीज यासारख्या समस्या पडत नाहीत. दुसरा भारत असा आहे की गरीब पिचलेल्या लोकांचा भारत आहे. या दोन भारतामधील दरी वाढत असल्याचं गांधी म्हणाले.


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha