नवी दिल्ली : महिन्याभराच्या राजस्थानमधील सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. आवाजी मतदानानं प्रस्ताव मंजूर करण्यात आला. काँग्रेसचे घरवापसी केलेले बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. विरोधकांच्या अनेक प्रयत्नांनंतरही निर्णय सरकारच्या बाजुनं लागला, अशी प्रतिक्रिया सचिन पायलट यांनी दिली.


उपमुख्यमंत्री असताना विधानसभेत गहलोत यांच्या बाजुला पायलट यांचं स्थान होतं. आता ते मंत्री नसल्यानं त्यांना एका बाजुला स्थान देण्यात आलं होतं. त्यावर बोलताना ते म्हणाले की, कोण कुठे बसतं हे महत्वाचं नाही. लोकांच्या मनात काय आहे हे अधिक महत्वाचं आहे. राजस्थानच्या सत्तासंघर्षात सरकार तरल्यामुळे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं स्थान आता आणखी मजबूत झालं आहे.


अशोक गेहलोत सरकारने विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे, गेहलोत सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचं भाजपने जाहीर केलं होतं. विरोधकांनी अनेक प्रयत्न करुनही आमच्या सरकारच्या बाजूने निर्णय लागला असल्याचंही ते म्हणाले आहेत.