नवी दिल्ली : पेट्रोलच्या दरवाढीवरुन सरकारवर चहुबाजूने टीका होत असताना, या दरवाढीबाबत केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना मात्र काहीच वाटत नसल्याचं चित्र आहे. दरवाढ न परवडायला चारचाकी आणि दुचाकी वाहनधारकांकडे पैशांची कमी आहे का? ते नक्कीच उपाशी नसतील, असं वक्तव्य अल्फोन्स कन्नथनम यांनी केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


'पेट्रोल, डिझेल खरेदी करण्यासाठी ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांनी ते दिलेच पाहिजेत. कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सरकारला पैसा लागतो, तो पैसा कर रुपानं उभा केला जातो, गरीबांना प्रतिष्ठेचं जीवन जगता यावं हा यामागचा उद्देश आहे. पेट्रोल दरवाढ न परवडायला चारचाकी आणि दुचाकी वाहनधारकांकडे पैशांची कमी आहे का? ते नक्कीच उपाशी राहत नसतील' असं अल्फोन्स म्हणाले.

समाजातील पिचलेल्या वर्गासाठी केंद्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. अनेक गावांमध्ये वीज पोहचवायची आहे, अनेकांना निवारा उपलब्ध करुन द्यायचा आहे. तर काही ठिकाणी शौचालयांची व्यवस्था करायची आहे. या सर्व उपक्रमांसाठी प्रचंड प्रमाणात पैसा खर्च होतो, असं अल्फोन्स म्हणाले.

'ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांच्याकडून आम्ही जास्त कर आकारत आहोत. जेणेकरुन गरिबांना प्रतिष्ठेने जीवन जगता येणे शक्य व्हावे. त्यासाठी सरकार कराच्या रुपाने पैसा गोळा करत आहे. आम्ही तो चोरत नाही', असंही अल्फोन्स कन्नथनम यांनी खडसावून सांगितलं.