Russia-Ukraine War : सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरु आहे. याचा परिणाम भारतातही होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारताने रविवारी युक्रेन आणि रशियाकडे चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले की, भारतीय नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि युक्रेनमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने जिनिव्हास्थित इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस (International Committee of the Red Cross) शी देखील संपर्क साधला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेला पंतप्रधानांच्या सूचनेनुसार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचेही हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले. आत्तापर्यंत भारताने युक्रेनमधून सुमारे 2,000 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. त्यापैकी 1,000 लोकांना हंगेरी आणि रोमानियामार्गे चार्टर्ड विमानांनी भारतात आणले आहे. 


दरम्यान, रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत त्यांना सांगितले असल्याची माहिती हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेला पंतप्रधानांच्या सूचनेनुसार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगतिले. दरम्यान, रोमानिया येथून 249 भारतीय नागरिकांना घेऊन विमान दिल्लीकडे रवाना झाले आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी याबाबत माहिती दिली. 


दरम्यान, युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये मागील पाच दिवसांपासून युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने Operation Ganga सुरु केले आहे. त्याअंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणले जात आहे. त्याशिवाय युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी OpGanga helpline नावाचे ट्विटर अकाऊंट उघडण्यात आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसंबंधित सर्व प्रश्न या ट्विटर अकाऊंटवर टाकल्यास उत्तर देण्यात येणार आहेत.


युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) राबविण्यात येत आहे. Operation Ganga अंतर्गत आतापर्यंत शेकडो भारतीयांना मायदेशात आणले आहे. आतापर्यंत चार विमाने भारतात दाखल झाली आहेत. युक्रेनवर शुक्रवारी रशियाने हल्ला (Ukraine Russia war) केला होता. त्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने वेगाने प्रयत्न सुरु केले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: