Lockdown Extended in Telangana : तेलंगणामध्ये कोरोना व्हायरस महामारीच्या (COVID Pandemic in Telangana) प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यााठी राज्य सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता तेलंगणात 30 मेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. आधी तेलंगणा सरकारनं 22 मेपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. यामध्ये दररोज सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत नागरिकांना अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी सूट देण्यात आली होती. 


तेलंगणातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी, मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊन लावण्यावर निर्णय झाल्यावर त्याची घोषणा करण्यात करण्यात आली. 


याव्यतिरिक्त कृषी आणि यासंबंधित क्षेत्रांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांशी (Essential Services) निगडीत क्षेत्रांनाही लॉकडाऊनमधून वगळण्यात आलं होतं. जसं औषध कंपन्या, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, औषध वितरक आणि औषधांची दुकानं, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या चिकित्सकीय आणि आरोग्य सेवांशी निगडीत व्यक्तींना लॉकडाऊनमधून वगळण्यात आलं आहे. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना विशेष पास देण्यात येतील. 


तेलंगणातील मंत्रिमंडळानं कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर दैनंदिन आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांसोबत सर्व जिल्हा अध्यक्षांची  एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.


तेलंगणा सरकारनं यापूर्वी 11 मे रोजी दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर 12 मेपासून राज्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. या निर्बंधांमध्येही नागरिकांना सकाळी चार तासांसाठी अत्यावश्यक सेवांच्या खरेदीसाठी सूट देण्यात आली होती. 


महत्त्वाची बाब म्हणजे, तेलंगणामध्ये काल (मंगळवारी) संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत कोरोनाचे 3,982 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 5,186 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच राज्यात आता एकूण संसर्ग झालेल्यांची संख्या 5,36,766 वर पोहोचली आहे. राज्यात एकूण 3,012 रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 4,85,644 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :