नवी दिल्ली : ग्लोबल एक्सपर्ट्सने केलेल्या सर्व्हेतून भारतासाठी एक लाजिरवाणी आकडेवारी समोर आली आहे. या सर्व्हेनुसार, महिलांसाठी असुरक्षित असणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात महिलांवर लैंगिक अत्याचार करणं फारच सोपं आहे, हेच महिलांच्या असुरक्षिततेमागचं मुख्य कारण देण्यात आलं आहे.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे महिला असुरक्षिततेबाबतीत भारत हा अफगाणिस्तान आणि सौदीपेक्षाही वरच्या क्रमांकावर आहे.

तासाला चार महिलांवर बलात्कार

भारतात प्रत्येक तासाला चार महिलांवर बलात्कार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, 2007  ते 2016 या कालावधीत भारतातील महिला अत्याचारांत 83 टक्क्यांनी वाढ झाली.

 2011 साली भारत चौथ्या स्थानी

2011 सालीदेखील असा सर्व्हे घेण्यात आला होता, ज्यामध्ये भारत चौथ्या स्थानी होता. तेव्हा अफगाणिस्तान, कॉन्गो, पाकिस्तान आणि भारताला महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश म्हणण्यात आलं होतं. या सर्व्हे एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की, भारताने 2012 साली निर्भया प्रकरण होऊनही महिला सुरक्षेच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले नाहीत. परिणामी, सात वर्षांपूर्वी चौथ्या स्थानी असलेला भारत आता पहिल्या स्थानी गेला.

अमेरिका तिसऱ्या क्रमांकाचा असुरक्षित देश

भारत या क्रमवारीत पहिल्या स्थानी आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच दुसरी खळबळजनक गोष्ट या सर्व्हेतून समोर आली आहे. महिलांसोबत सर्वाधिक लैंगिक हिंसा होणाऱ्या देशात अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.