Hate Speech :  काही दिवसांपूर्वी दिल्ली आणि हरिद्वार येथे झालेल्या धार्मिक संघटनांच्या कार्यक्रमात देण्यात आलेल्या चिथावणीखोर भाषणांवर सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी चिंता व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टातील जवळपास 76 वकिलांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणात सरन्यायाधीशांनी स्वत: हून दखल द्यावी अशी मागणी वकिलांनी केली आहे. 


दिल्लीमध्ये हिंदू युवा वाहिनी आणि उत्तराखंड येथील हरिद्वारमध्ये यती नरसिंहानंद यांनी आयोजित केलेल्या धर्मसंसदेत चिथावणीखोर भाषणे करण्यात आली आहे. ही दोन कार्यक्रमे 17 आणि 19 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती. या भाषणांमध्ये अल्पसंख्याकांच्या नरसंहारासाठी चिथावणी देण्यात आली होती. 


आरोप काय?


धर्म संसदेत साधू-संतांच्या हिंदुत्व आणि मुस्लिमांबाबत केलेल्या वादग्रस्त भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये संत आणि धर्मगुरूंनी धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलणे, मुस्लिमांना पंतप्रधान होऊ न देणे, मुस्लिमांची लोकसंख्या वाढू न देणे, शैक्षणिक पुस्तके सोडून देणे आणि शस्त्रे हाती घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. 


व्हायरल व्हिडिओनुसार, यति नरसिंहानंद म्हणाले, आता आर्थिक बहिष्कार चालणार नाही. हिंदूंनी तलवारींबद्दल विसरून जा. तलवारी रंगमंचावरच छान दिसतात. उत्तम शस्त्रे असलेले लोकच ही लढाई जिंकतील. अधिकाधिक मुले आणि चांगली शस्त्रे तुम्हाला वाचवतील. 


आतापर्यंत कोणालाही अटक नाही 


हरिद्वार येथे आयोजित 'धर्म संसद'मध्ये अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार भडकवण्यासाठी द्वेषयुक्त भाषणे केल्याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha