इंदौर : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी इंग्रजी भाषेत एक पानी सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोट सापडली असून, आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार न धरण्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.


कुटुंबाची काळजी कुणीतरी घ्या. ताण असह्य झाला आहे. खूप थकलोय. मी सोडून जात आहे, असे भय्यू महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.



गोळी झाडून जीवन संपवलं!

भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळ्या झाडल्या, त्यावेळी घरात त्यांची आई आणि पत्नीही होती. गोळ्यांचा आवाज ऐकून तेथे उपस्थित सहकाऱ्यांच्या मदतीने भय्यू महाराजांच्या रुमचा दरावाजा तोडण्यात आला आणि त्यांना बाहेर काढून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत.. सर्वांशी सख्य, भय्यू महाराज कोण होते?


भय्यू महाराज यांचं मूळ नाव उदयसिंह देशमुख आहे. मध्य प्रदेशातील शुजालपूरमध्ये 1968 साली त्यांचा जन्म झाला.भय्यू महाराजांचं कुटुंब मूळचं अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालूक्यातील तामसी गावाचं. मात्र पाच दशकांपूर्वी त्यांचे वडील मध्यप्रदेशातील शुजालपूर गावात स्थायिक झाले. त्यानंतर त्यांचा या गावाशी अगदी तुरळक असा संबंध आला.


लहानपणापासूनच त्यांचा आध्यात्माकडे कल होता. घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा शौक त्यांना होता.


भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला. ‘सियाराम’ या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगही त्यांनी केली. मात्र आध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली. सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टची सुरुवात केली.


दिग्गजांसोबत उठबस


भय्यूजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधलं जातं. अध्यात्मिक क्षेत्रात ते प्रसिद्ध आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रीय होते. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांची उठबस असे. इंदूरमध्ये त्यांचं मुख्यालय आणि आश्रम आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भय्यू महाराजांचे अनुयायी आहेत.


आतापर्यंत अनेक दिग्गजांच्या आश्रमाला भेटी


कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, शरद पवार, लता मंगेशकर, उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी इत्यादी अनेक दिग्गज भय्यू महाराजांच्या आश्रमात जाऊन आले आहेत.


अण्णांच्या आंदोलनात मध्यस्थाची भूमिका


भय्यू महाराज यांनी 2011 साली लोकपाल आंदोलनातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. अण्णा हजारेंचं आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने भय्यू महाराजांनी दूत म्हणून पाठवले होते. तसेच, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा सद्भावना उपवास सोडण्यासाठी भय्यू महाराज यांना बोलावले गेले होते.


भय्यू महाराज यांचं कार्य


भय्यू महाराज हे सदगुरु धार्मिक ट्रस्ट नावाने ट्रस्ट चालवत असत. या ट्रस्टच्या माध्यमातून स्कॉलरशिप देत. तसेच, कैद्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करत. शेतकऱ्यांना बियांणांचे वाटप असो किंवा शेतकऱ्यांना विविध मदत करण्यासाठीही त्यांनी मदत केली. भूमी सुधारणा, पेयजल आणि बालशिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले आहे.


नगरच्या निर्भयाचं स्मारक


अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्या वतीनं अहमदनगरमधील कोपर्डी इथं बलात्कार पीडित चिमुकलीचं स्मारक बांधण्यात आलं होतं.


भय्यू महाराजांवर हल्ला


महाराष्ट्रात मराठा मोर्चे निघत होते त्या काळात भय्यूजी महाराज यांच्यावर हल्लेही झाले होते.


भय्यू महाराज यांच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार त्यांच्या चालकानं 10 मे 2016 रोजी दाखल केली होती. या हल्ल्यामध्ये भय्यूजी महाराज सुखरुप होते, तर कारचालक आणि सहकाऱ्यांना इजा झाली होती.


काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेश सरकारने भय्यू महाराजांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊ केला होता. मात्र त्यांनी तो दर्जा नाकारला होता.