इंदूर: आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं  होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


भय्यू महाराज यांनी आत्महत्या का केली, याबाबतची माहिती अजून कळू शकलेली नाही.

भय्यूजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधलं जातं. अध्यात्मिक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रीय होते. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांची उठबस होते.

मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आणि भय्यू महाराजांनी गोळी झाडली! 


काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत.

कोण होते भय्यू महाराज?

भय्यू महाराज यांचं मूळ नाव उदयसिंह देशमुख आहे. मध्य प्रदेशातील शुजालपूरमध्ये भय्यू महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा आध्यात्माकडे कल होता. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा शौक होता.

भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला. सियाराम या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगही त्यांनी केली. मात्र आध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली. सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टची सुरुवात केली.

भय्यू महाराजांची सुसाईड नोट सापडली! 


इंदूरमध्ये भय्यू महाराजांचं मुख्यालय आणि आश्रम आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भय्यू महाराजांचे अनुयायी आहेत. भूमी सुधारणा, पेयजल आणि बालशिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले आहे.


दुसरं लग्न

भय्यू महाराज यांनी गेल्या वर्षी 30 एप्रिल 2017 रोजी दुसरं लग्न केलं होतं.

चार वर्षांपूर्वी भय्यू महाराज यांच्या वडिलांचं आणि 2 वर्षांपूर्वी पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर कौटुंबिक स्वास्थ हरवलं होतं. त्यामुळे त्यांच्या आई आणि बहिणींनी लग्नासाठी त्यांच्यामागे तगादा लावला होता. अखेर घरच्यांच्या आग्रहाखातर भय्यू महाराज पुन्हा लग्नबंधनात अडकले होते.

दिग्गज नेत्यांचे निकटवर्तीय

भय्यू महाराज यांनी 2011 साली लोकपाल आंदोलनातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. अण्णा हजारेंचं आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने भय्यू महाराजांनी दूत म्हणून पाठवले होते. तसेच, गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा सद्भावना उपवास सोडण्यासाठी भय्यू महाराज यांना बोलावले गेले होते.

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी,  शरद पवार, महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, लता मंगेशकर, उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी इत्यादी अनेक दिग्गज भय्यू महाराजांच्या आश्रमात जाऊन आले आहेत.

भय्यू महाराज यांचं कार्य

भय्यू महाराज हे सदगुरु धार्मिक ट्रस्ट नावाने ट्रस्ट चालवत असत. या ट्रस्टच्या माध्यमातून स्कॉलरशिप देत. तसेच, कैद्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करत. शेतकऱ्यांना बियांणांचे वाटप असो किंवा शेतकऱ्यांना विविध मदत करण्यासाठीही त्यांनी मदत केली.

नगरच्या निर्भयाचं स्मारक

अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्या वतीनं अहमदनगरमधील कोपर्डी इथं बलात्कार पीडित चिमुकलीचं स्मारक बांधण्यात आलं होतं.

भय्यू महाराजांवर हल्ला

महाराष्ट्रात मराठा मोर्चे निघत होते त्या काळात भय्यूजी महाराज यांच्यावर हल्लेही झाले होते.

भय्यू महाराज यांच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार त्यांच्या चालकानं 10 मे 2016 रोजी दाखल केली होती. या हल्ल्यामध्ये भय्यूजी महाराज सुखरुप होते, तर कारचालक आणि सहकाऱ्यांना इजा झाली होती.

सकल मराठा मोर्चाच्या आयोजकांना माझ्या समर्थकांनी कोणताही त्रास दिलेला नाही, असं स्पष्टीकरण भय्यूजी महाराज यांनी 21 ऑक्टोबर 2016 रोजी  दिलं होतं . समर्थकांनी मराठा मोर्चेकऱ्यांना धमक्या दिल्याच्या आरोपाचं त्यांनी खंडन केलं होतं.

संबंधित बातम्या

EXCLUSIVE : भय्यू महाराजांनी मंत्रिपद का घेतलं? भय्यू महाराजांशी खास बातचित    

भय्यू महाराज पुन्हा विवाहबंधनात! 

मराठा समाजाचे मोर्चे दलितविरोधी नाहीत, भय्यूजी महाराजांचं मत 

 धर्माच्या नावावर कोट्यवधी उधळता, मग शेतकऱ्यांना मदत का नाही? : भय्यूजी महाराज  

भय्यू महाराजांसह पाच आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा   

संभाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध का केला नाही: भय्यू महाराज   

कोपर्डीतल्या विद्यार्थिनींनी शिक्षण सोडू नये, भय्यू महाराजांचा पुढाकार