New Delhi : देशांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Monsoon) कहर केला आहे. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात पावसाने झोडपून टाकले आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजही देशाच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज देशातील अनेक शहरांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान खात्याचा इशारा लक्षात घेता दिल्लीतील सर्व शाळा आज (10 जुलै) एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर, गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने येत्या 15 जुलैपर्यंत शाळा बंद राहतील अशी सूचना दिली आहे. या काळात सर्व नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. तसेच, अत्यंत आवश्यक काम असेल तेव्हाच घर सोडण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. 


गुरुग्राम आणि फरिदाबादमध्येही आज शाळा बंद


गुरुग्राममधील सर्व खाजगी कार्यालये आणि खाजगी संस्थांना आज घरून काम करण्यास सांगितले आहे. मुसळधार पावसामुळे गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील सर्व शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना लेखी आदेश जारी केला आहे. जिल्हा शाळा निरीक्षक धरमवीर सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर डीएमने हा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत आज जिल्ह्यातील सर्व प्रभागातील इयत्ता पहिली ते 12 वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नोएडातील मुसळधार पाऊस लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी मनीष कुमार वर्मा यांनी यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. 


पंजाबमध्येही शाळांना सुट्टी


चंदीगडमध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले होते. आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने आज आणि उद्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी अॅडव्हायजरीही जारी करण्यात आली आहे. 


हिमाचल प्रदेशात 11 जुलैपर्यंत शाळांना सुट्टी 


पावसामुळे डोंगर भागांत, पर्वतांमध्ये अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशातील शाळा आणि महाविद्यालये 11 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुखू सरकारने या संदर्भात आदेश जारी केला आहे. गेल्या 24 तासांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. कुल्लू सारख्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती खूपच वाईट आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


IMD Rain Update : उत्तर भारतात 'जलप्रलय'...हिमाचल-उत्तराखंडमध्ये नद्यांना तडाखा; IMD कडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा