लखनौ : राम मंदिर हा आपल्या आस्थेचा, विश्वासाचा आणि अभिमानाचा विषय आहे, त्यासाठी तुरुंगात आणि वेळ पडलीच तर फाशीवर जाईल, असं वक्तव्य केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी केलं आहे.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत भेट झाल्यानंतर राम मंदिर विषयावर चर्चा झाली का, असा प्रश्न उमा भारती यांना विचारण्यात आला होता.

राम मंदिर या विषयावर योगी आदित्यनाथ आणि मला बोलण्याची गरज नाही. दोघांनाही हा विषय परिचित आहे. मात्र सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर फार बोलणार नाही, असंही उमा भारती म्हणाल्या.

राम मंदिर प्रकरण हे संवेदनशील मुद्दा आहे, दोन्ही पक्षांनी कोर्टाबाहेरच हा विषय संपवावा, गरज लागल्यास कोर्ट मध्यस्थी करेल, असं सुप्रीम कोर्टाने नुकत्याच झालेल्या एका सुनावणीत म्हटलं होतं.

राम मंदिर प्रकरणावर एक नजर

  • अयोध्येत श्री रामाचा जन्म झाल्याची धारणा हिंदूंची आहे.

  • हिंदू पक्षाचा आरोप आहे की 16 व्या शतकात राम मंदिर तोडून बाबरी मस्जिद बांधण्यात आली.

  • ज्यावेळी मशिदीत श्री रामाची मूर्ती ठेवली तेव्हापासून म्हणजेच 1949 पासून हा वाद सुरु आहे.

  • 1980 च्या शेवटी आणि 1990 च्या दशकाच्या सुरुवातील भाजपने हा मुद्दा हाती घेतला.

  • 6 डिसेंबर 1992 रोजी वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली.


2010 मध्ये हायकोर्टाने काय निर्णय दिला होता?

  • अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने अयोध्येतील विवादित स्थळ राम जन्मभूमी असल्याचं मान्य केलं होतं.

  • हायकोर्टाच्या दोन न्यायाधीशांनी निर्णय देताना, जमीनीचा एक तृतीयांश जागा मुस्लिम गटाला दिली होती. तीन गटात ही जमीन विभागण्याचा निर्णय दिला होता. मात्र त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं होतं.

  • श्री रामाची मूर्ती 22/23 डिसेंबर 1949 च्या रात्री मशिदीत ठेवली असं हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी म्हटलं होतं.

  • भारतीय पुरातत्व विभागाने मशिदीच्या जागी खोदकाम केलं होतं, त्यावेळी त्यांना भव्य प्राचीन मंदिराचे अवशेष मिळाले होते.

  • हा खटला गेल्या 65 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे.


संबंधित बातमी : राम मंदिर खटला संवेदनशील, सहमतीने सोडवा : सुप्रीम कोर्ट