नवी दिल्ली : बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशातील संबंध दृढ करणं आणि परस्पर गुंतवणूक तसंच व्यापार सहकार्य यावर चर्चा केली जाणार आहे.


पश्चिम बंगालमधून वाहणाऱ्या तिस्ता नदीच्या पाणीवाटपाविषयी दोन्ही देशांमध्ये तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिस्ता नदीच्या पाणीवाटप कराराचा प्रश्न गेली 50 वर्षे प्रलंबित आहे. या नदीचं पाणी पश्चिम बंगालला देण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा विरोध आहे. मात्र बांग्लादेशचा विरोधी पक्ष या पाण्याबाबत आग्रही असल्यामुळे शेख हसीनांवर मोठा दबाव आहे.

शुक्रवारी नवी दिल्लीत शेख हसीना यांचं आगमन झालं. सर्व प्रोटोकॉल बाजुला ठेवून पंतप्रधान मोदी हसीना यांच्या स्वागताला विमानतळावर गेले होते. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर शेख हसीना यांची ही पहिलीच भारतभेट आहे. या दौऱ्यात त्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत.

https://twitter.com/narendramodi/status/850549712402997250

https://twitter.com/narendramodi/status/850550001256333312

बांग्लादेशशी असलेले संबंध दृढ करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी केलं होतं. बांग्लादेशी सैन्याला शस्त्रसाठा घेण्यासाठी 500 मिलियन डॉलर देण्याचा सामंजस्य करारही उभय देशांमध्ये होणार आहे.