मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले पत धोरण जाहीर केलं असून त्यामध्ये व्याज दरात कोणताही बदल केला नाही. सर्व व्याज दर 'जैसे थे' ठेवण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  


कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आरबीआयने महत्वाच्या घटकांमध्ये म्हणजे रेपो दर, रिव्हर्स रेपो दरामध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सध्याचा रेपो दर हा 4 टक्केच राहील तर रिव्हर्स रेपो दर हा 3.35 टक्के कायम राहिल. तसेच मार्जिनल स्टॅन्डिंग फॅसिलिटी रेट हा 4.25 टक्के आणि बॅंक दर हा 4.25 टक्के असेल.


 






आरबीआयच्या या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांचा ईएमआय कमी होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. ग्राहकांना त्यांचा इएमआय कमी होण्यासाठी आता अजून काही काळाची वाट पहावी लागणार आहे.


आरबीआयने या वर्षीचा विकास दर हा  9.5 टक्के राहिल असाही अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आरबीआयने आपल्या सलग सातव्या आर्थिक धोरणांत व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. गेल्या वेळच्या आर्थिक धोरणातही आरबीआयने आपल्या व्याज दरात कोणताही बदल केला नव्हता.


भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटातून सावरत असून लसीकरणाची गती वाढेल तसं अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचा विश्वास आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला. 


कोरोनाचा मोठा आर्थिक फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला असून त्यामुळे गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच जीडीपीने निच्चांक गाठला असून तो 2020-21 या वर्षासाठी -7.3 ने घसरला होता


काय आहे रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर? 
आरबीआय इतर बॅंकांना ज्या दराने कर्ज देते त्या दराला रेपो दर म्हटलं जातंय. आरबीआयकडून या साधनाचा वापर देशातील महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलं जातं. याच्या उलट रिव्हर्स रेपो दर असतो. या दरानं आरबीआय बँकाकडून कर्ज घेते.


महत्वाच्या बातम्या :