मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या व्याज दरात कोणताही बदल केला नसून सर्व व्याज दर 'जैसे थे' ठेवण्यात आले आहेत. तसेच या वर्षीचा विकास दर हा  9.5 टक्के राहिल असाही अंदाज व्यक्त केला आहे. या आधी तो 10.5 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला गेला होता. आरबीआयने आपल्या सलग सहाव्या आर्थिक धोरणांत व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. 


कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आरबीआयने महत्वाच्या घटकांमध्ये म्हणजे रेपो दर, रिव्हर्स रेपो दरामध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सध्याचा रेपो दर हा 4 टक्केच राहील तर रिव्हर्स रेपो दर हा 3.35 टक्के कायम राहिल. तसेच मार्जिनल स्टॅन्डिंग फॅसिलिटी रेट हा 4.25 टक्के आणि बॅंक दर हा 4.25 टक्के असेल. 


चालू वर्षाचा विकास दर घटवला
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मॉनेटरी पॉलिसी जाहीर करताना सांगितलं की, चालू आर्थिक वर्षात विकास दर हा 9.5 टक्के राहण्याची शक्यता आहे. या आधी तो 10.5 टक्के इतका राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तसेच या वर्षीचा महागाईचा दर हा 5.1 टक्के राहण्याची शक्यता आहे.


महागाईचा कमी होत असलेला दर आणि मान्सूनची सकारात्मक शक्यता या घटकांमुळे देशाची अर्थव्यवस्था रुळावर येण्याची शक्यताही आरबीआयने व्यक्त केली आहे. 


गेल्या वेळच्या आर्थिक धोरणातही आरबीआयने आपल्या व्याज दरात कोणताही बदल केला नव्हता. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आता सलग सहाव्यांदा आरबीआयने आपल्या व्याज दरात कोणताही बदल केला नाही. 


गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक समाप्त झाली आहे. त्यानंतर आरबीआयनं आपले आर्थिक धोरण जाहीर केलं आहे. कोरोनाचा मोठा आर्थिक फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला असून त्यामुळे गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच जीडीपीने निच्चांक गाठला असून तो 2020-21 या वर्षासाठी -7.3 ने घसरला होता. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने आपली मॉनेटरी पॉलिसी जाहीर केली आहे. 


महत्वाच्या बातम्या :