अयोध्या : अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे.  अयोध्येच्या चौकाचौकात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झाले आहेत. आज भूमीपूजनाचा सोहळा तर होईलच मात्र राममंदिराचं काम कधी पूर्ण होईल, याची उत्सुकता आता भक्तांना लागली आहे. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी श्री राम जन्मभूमि तीर्थ ट्रस्टचे ट्रस्टी स्वामी परमानंद महाराज यांच्याशी एबीपी न्यूजने संवाद साधला.


यावेळी स्वामी परमानंद महाराज यांनी सांगितलं की, लवकरात लवकर मंदिराचं निर्माण पूर्ण केलं जाईल. भूमीपूजनानंतर लगेचच मंदिर निर्माणाचं काम सुरु होईल.  ट्रस्टकडून मंदिर निर्माण करणाऱ्या कंपनीला मंदिराचं पूर्ण निर्माण करण्यासाठी पुढच्या 32 महिन्यांना वेळ दिला आहे. म्हणजे 2 वर्ष आणि आठ महिन्यात मंदिराचं निर्माण पूर्ण होऊ शकतं.  परमानंद महाराज म्हणाले की, देशात ज्या ज्या ठिकाणी शिला पूजन केलं आहे. त्या सर्व शिलांचा वापर राम मंदिर निर्माणासाठी केला जाणार आहे.

ऐतिहासिक राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे. काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भूमीपूजनाच्या जागेसह अन्य भागाची पाहणी केली तसेच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा देखील घेतला. अयोध्येच्या चौकाचौकात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झाले आहेत. अयोध्यानगरीत दाखल होताच भक्ताचं लक्ष विविध चित्र आणि होर्डिंगनं आकर्षित होत. संपूर्ण शहरात प्रभू श्री रामाच्या जीवनाशी संबंधित वेगवेगळी कलाकृती साकरण्यात करण्यात आली आहे. अयोध्येतल्या अनेक भिंतीवर मोठमोठे चित्रही काढण्यात आली आहे. मोठे शहरातील मोठे पूल, उद्याने आणि बऱ्याचं महत्त्वाच्या ठिकाणांची दुरुस्ती करण्यात आली आहे. या सगळ्याचा आढावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला.

गणेश पूजन संपन्न

प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाच्या कार्यक्रमाला कालपासून सुरुवात झाली आहे. काल सकाळी या मंदिराच्या ठिकाणी गणेश पूजन पार पाडलं. सकाळी 9 वाजता सुरु झालेलं हे पूजन दुपारी 1 वाजता संपन्न झालं. हिंदू धर्मात कुठल्याही शुभकार्यााआधी गणेशाची पूजा केली जाते त्याप्रमाणे हा सोहळा संपन्न झाला.  तिनही दिवसांच्या कार्यक्रमांसाठी मोजकेच पुजारी नेमण्यात आले आहेत आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत .

अयोध्येच्या नाक्या- नाक्यावर पोलिस तैनात

अयोध्यानगरी पंतप्रधान नरेद्र मोदींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पंतप्रधान नरेद्र मोदी येण्याच्या एक दिवस आधी अयोध्येला लागून असलेल्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहेत. जे छोटे मोटे मार्ग आहेत त्याठिकाणी बॅरिकेटींग लाऊन तपासणी सुरु ठेवण्यात येणार आहे. अयोध्याच्या शेजारील जनपद बस्ती, गोंडा, आंबेडकरनगर, बाराबंकी, सुलतानपुर, अमेठी या शहरांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अयोध्येत शरयू नदीच्या माध्यामातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तर प्रदेश सराकरची जलसेना तैनात करण्यात आली आहे. सीसीटीव्ही, राखीव दल, वाहतुक पोलिसांच्या तुकड्या रस्त्यारस्त्यावर तैनात करण्यात आल्या आहेत.

अयोध्येच्या लोकांमध्ये उत्साह

आपण जशी दिवाळी साजरी करतो तसं सध्या अयोध्येत वातावरण पाहायला मिळतंय. घरांना रंगेबीरंग कलर, साफसफाई, दुकानांमध्ये गर्दी तसेच प्रत्येक जण या भूमिपूजनाच्या मुर्हुतावर आनंद साजरा करण्यासाठी मिठाईच्या दुकानांकडे रांग लावतोय. अयोध्येत पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पोस्टरबरोबर सगळीकडे भगवे झेंडे फडकताना दिसत आहेत. तसेच जो तो रामभक्त आपल्या गाडीवर किंवा घरावर प्रभू रामचं, हनुमानाचं चित्र असलेला झेंडा लावताना मग्न आहे.

मंचावर पंतप्रधान मोदी यांच्यासह केवळ पाच जणच

सोहळ्यात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदी यांच्यासह केवळ पाच जणच उपस्थित राहतील, अशी माहिती मिळाली आहे. या मुख्य भूमिपूजन सोहळ्या मंचावर केवळ पाच मान्यवर असतील. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे उपस्थित असतील.

पहिलं निमंत्रण अयोध्या प्रकरणात मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारी यांना

राम मंदिर भूमीपूजनाचं पहिलं निमंत्रण अयोध्या प्रकरणात मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारी यांना पाठवण्यात आलं आहे. त्यांना हे आमंत्रण राम मंदिर ट्रस्टचे महंत चंपत राय यांच्यातर्फे पाठवण्यात आलं आहे. इक्बाल अंसारी यांच्यासह मुस्लिम पक्षकार  हाजी महबूब यांना देखील निमंत्रण दिलं आहे. तसंच बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करणारे पद्मश्री मुहम्मद शरीफ यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे.

भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत


Exclusive | राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रम कसा असणार? किती जण उपस्थित राहणार?

शरयू नदीच्या काठावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन

सकाळी राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर रात्री शरयू नदीच्या काठावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संपूर्ण सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्येत मोठं मोठे कटआऊट लावण्यात येणार आहेत. हा संपूर्ण सोहळा ऐतिहासिक सोहळा करण्यासाठी आता भाजपकडून मोठया प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत.

हे ही वाचा- 


Ram Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही


राम मंदिर निर्माणासाठी महाराष्ट्रातून पहिली वीट कोणी पाठवली? 


भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत


Ram Mandir | राममंदिराच्या भूमिपूजनाआधी अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण