लखनौ : अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाला सर्व धर्मीय लोक उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला राममंदिराचं भूमिपूजन होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. गरज पडल्यास या यादीत फेरबदल करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तयार केलेल्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वगळता देशातील एकाही मुख्यमंत्र्यांला निमंत्रण नाही.


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याने शिवसैनिकांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि अयोध्या रामजन्मभूमीचं भावनिक नातं आहे. यासोबत उद्धव ठाकरे यांनीही अयोध्या आणि शिवसेनेचे नातं पुढे टिकवून ठेवलं. मात्र तरी देखील उद्धव ठाकरे यांना राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने भूमिपूजनाचं निमंत्रण दिलं नाही. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं तर सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागेल. निवडक मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिल्यास वाद उद्भवू शकतो. आणि सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सर्व मुख्यमंत्र्यांना बोलवणे शक्य नाही. म्हणून केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.


राम मंदिर निर्माणासाठी महाराष्ट्रातून पहिली वीट कोणी पाठवली?


भूमिपूजनाला सर्व धर्मांच्या आचार्यांना बोलण्याचा निर्णय झाला आहे. राममंदिर केसचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांचंही नाव पाहुण्यांच्या यादीत आहे. बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि मुस्लीम समाजाचे काही विशेष मान्यवरांना बोलावण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनाह निमंत्रण आहे. अमित शाह आणि राजनाथ सिंह यांचं नाव या यादीत सामील आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. योगगुरु बाबा रामदेव यांचंही नाव यामध्ये आहे.


संबंधित बातम्या