मुंबई : ऐतिहासिक राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी अयोध्येला पोहचणार आहेत. या कार्यक्रमाला 200 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी साधू, संत, अधिकारी, नेता, विहिप- न्यास यांच्या व्यतिरिक्त देशातील 50 विशेष अतिथी सहभागी होणार आहेत. यामध्ये देशातील मोठ्या उद्योगपतींचा देखील समावेश असणार आहे. याबाबत नुकतीच राम मंदीर ट्रस्टने एक यादी जाहीर केली आहे. ज्यात मुकेश अंबानी आणि गौतम अडाणी यांची नावे समाविष्ट आहेत. यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर 5 ऑगस्टला सकाळी 11.30 वाजता अयोध्येतील साकेत महाविदयालयाच्या पटांगणात उतरेल. यानंतर ते पहिल्यांदा हनुमान गढीला किंवा राम जन्मभूमीकडे जातील हे अद्याप निश्चित झालेलं नाही. परंतू सध्या चर्चा अशी आहे की, राम जन्मभूमीच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक तास संबोधन करणार आहेत. ज्याचं प्रसारण अयोध्येत ठिकठिकाणी एलईडी स्क्रिन लाऊन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अयोध्येपासून फैजाबाद पर्यंत लाऊड स्पीकरच्या माध्यमातून मंत्रच्चोर ऐकू येणार आहे.


सकाळी राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर रात्री शरयू नदीच्या काठावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संपूर्ण सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्येत मोठं मोठे कटआऊट लावण्यात येणार आहेत. हा संपूर्ण सोहळा ऐतिहासिक सोहळा करण्यासाठी आता भाजपकडून मोठया प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाचं अयोध्येत येतं आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरचं संकट आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ज्या ठिकाणी विशेष अतिथिच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी प्रत्येक खुर्चीमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला हँडग्लोज, मास्क आणि सँनिटायझर वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. सध्या राम मंदिर ट्रस्टकडून कोरोना आजारापासून वाचण्यासाठी आवश्यक ते सर्व सुरक्षेचे उपाय अयोध्येत करण्यात आले आहेत.


काही दिवसांपूर्वी माध्यमांना माहिती देताना राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंद देवगिरी म्हणाले होते की, राम मंदिराची उभारणी गुजरातमधली सोनपुरा कुटुंब करणार आहे. याचं कुटुंबानं प्रसिद्ध सोमनाथाचं मंदिर, अंबाजींच्या मंदिराची उभारणी केली आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या स्वामीनारायण मंदिराची उभारणीदेखील त्यांनी केली आहे. राम मंदिराची उंची ठरल्याप्रमाणे 161 फूट असणार आहे. हे मंदिर दोन मजली असेल या दोन मजल्यांच्यावर मंदिराचा शिखर असेल. संसद भवन ज्या प्रकारे एका उंच पायावर उभारण्यात आलं आहे तशाच पद्धतीने उंच पाया घेऊन त्यावर 161 फूटांचं मंदीराचं बांधकाम होणार आहे. अशोक सिंघल यांच्या उपस्थितीत सर्व चर्चा करुन सर्व प्रमुख संतांनी मिळून जो आराखडा ठरवला होता. तेच प्रारुप आबाधित ठेवलं आहे, त्यात शक्य तेवढी भव्यता आणावी यासाठी त्यात 20 फूट उंची वाढवून एक मजला वाढवण्यात आला आहे. तसेच अधिक तीन शिखरं करण्याची योजना होती ती आता पाच शिखरांची झाली आहे.


संबंधित बातम्या :