Rajiv Gandhi : राजीव गांधी हत्याकांडातील  (Rajiv Gandhi assassination convict Perarivalan) आरोपी पेरारिवलन याची जामिनावर सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, पेरारिवलन 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होता. त्याची वागणूक सातत्याने चांगली राहिली आहे. 


शिक्षा माफ करण्याचा अर्जही निर्णयाविना अडकला
पेरारिवलनने न्यायालयाला सांगितले की, तामिळनाडू सरकारच्या त्यांच्या सुटकेच्या आदेशाला राज्यपाल आणि केंद्राची मान्यता नाही. शिक्षा माफ करण्याचा त्यांचा अर्जही निर्णयाविना अडकला आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि बीआर गवई यांनी आदेशात हे युक्तिवाद नोंदवले आहेत. सुनावणीदरम्यान केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल केएम नटराज यांनी पेरारिवलनच्या सुटकेला कडाडून विरोध केला. ते म्हणाले की, 1999 मध्ये दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेत रूपांतर केले होते. राष्ट्रपतींना पेरारिवलनच्या दयेच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी बराच वेळ लागत असल्याचा आधार यामागे ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर त्याने बराच काळ तुरुंगात घालवला आहे, असेही सांगण्यात आले. 


तोपर्यंत दोषींना तुरुंगात डांबणे योग्य होणार नाही
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी असेही सांगितले की, पेरारिवलनची शिक्षा कायद्याने माफ करण्याचा निर्णय केंद्राने घ्यायचा आहे. न्यायालयाने याप्रकरणी आदेश देऊ नये. न्यायमूर्तींनी या युक्तिवादांची दखल घेतली, परंतु त्यांनी दोषीला जामिनावर सोडणे योग्य मानले. राज्य सरकार, राज्यपाल आणि केंद्राच्या अधिकाराच्या व्याख्येशी संबंधित या प्रकरणावर नंतर सविस्तर सुनावणी होईल, असा विश्वास न्यायालयाने व्यक्त केला. मात्र तोपर्यंत दोषींना तुरुंगात डांबणे योग्य होणार नाही. 21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूर येथे हत्या करण्यात आली. पेरारिवलनला 11 जून 1991 रोजी अटक करण्यात आली होती. बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेली 8 व्होल्ट बॅटरी विकत घेऊन हल्ल्याचा मास्टरमाईंड शिवरासन याला दिल्याप्रकरणी तो दोषी सिद्ध झाला आहे. घटनेच्या वेळी 19 वर्षांचा असलेला पेरारिवलनने तुरुंगात राहूनही अभ्यास सुरू ठेवला. त्याने चांगले गुण मिळवून अनेक पदव्या मिळवल्या. त्याला जामीन मंजूर करताना न्यायालयाने या बाबींनाही आदेशात स्थान दिले आहे.