अलवर : राजस्थानमध्ये गाय तस्करीच्या संशयात जमावाने एकाची हत्या केली घटना घडली आहे. अलवर जिल्ह्यातील बहरोडमध्ये दिल्ली-जयपूर हायवेवर 1 एप्रिल रोजी हा प्रकार घडला.


200 कथित गोरक्षकांनी गायींची वाहतूक करणाऱ्या 5 जणांना बेदम मारहाण केली. त्यापैकी एकाचा मंगळवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. परंतु अज्ञात 200 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर स्थानिक रहिवासी होते. कॅमेऱ्यातील फूटेजच्या आधारावर त्यांची ओळख पटवली जात आहे.



सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये कथित गोरक्षक पिक-अप गाडी तोडताना आणि गायी घेऊन जाणाऱ्यांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडीओ फेसबुकवर हटवण्यात आला.

दिल्ली-जयपूर हायवेवर 5 वाहनातून गायींची वाहतूक सुरु होती. यावेळी कथित गोरक्षकांनी आणि जमानाने हायवेवर वाहनांना रोखलं आणि गाडीतील लोकांना बेदम मारहाण केली. त्यापैकी 50 वर्षीय पहलू खान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, पहलू खान आणि त्यांच्या चार साथीदारांनी गाय खरेदीची कागदपत्रंही दाखवली. तरीही त्यांना मारहाण केली. तर हे लोक अवैधरित्या गायी घेऊन जात होते, असा आरोप गोरक्षकांनी केली आहे.

ओवेसींची प्रतिक्रिया
पोलिस तिथेच आहेत, व्हिडीओ अपलोड होतो. जयपूरच्या बाजारातून जनावरं खरेदी केल्याचं सांगूनही त्यांना मारहाण केली जाते. त्यापैकी मुस्लीम नसलेल्या ड्रायव्हरला सोडलं जातं. भाजपची सरकार आहे तर त्यांच्याविरोधात कारवाई का केली जात नाही?, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिली.