जयपूर : राजस्थानच्या भीलवाडामधील माडलगढच्या भाजप आमदार कीर्ती कुमारी यांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला. त्या 50 वर्षांच्या होत्या.


भाजप प्रवक्ते आनंद कुमार यांनी सांगितलं की, कीर्ती कुमार यांच्यावर सवाई मान सिंह रुग्णालयात उपचार सुरु होते. काल त्यांना एका खासगी रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. पण आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. कीर्ती कुमारी यांच्यावर भीलवाडा जिल्ह्यातील बिजोलिया गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कुमारी यांना राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी 2003 मध्ये राजकारणात आणलं होतं. पण 2003 मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवचरण माथुर यांनी कुमारी यांचा पराभव केला होता. पण 2013 च्या विधानसभा निवडणुकीत कुमारी यांनी काँग्रेस उमेदवार विवेक धाकड यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.

दरम्यान, कुमारी यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारच्या आरोग्यविषयक धोरणांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण राजस्थानच्या जयपूर, जोधपूर आणि बिकानेरमध्ये स्वाईन फ्लूने थैमान घातलं आहे. स्वाईन फ्लूचे जवळपास 300 संशयित रुग्ण आढळले असून, गेल्या दोन महिन्यात 11 जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.