मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार टीका केली आहे. मोदी आणि शाहांनी तरुणांचं भविष्य उद्धवस्त केल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. रोजगाराच्या प्रश्नांमुळे मोदी सरकार तुमच्या रागाचा सामना करू शकत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले


नागरिकत्व सुधारित कायदा आणि एनआरसीवरून राहुल गांधी तरूणांना ट्वीट करत म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. देशात असलेल्या बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान यामुळे जनतेच्या मनात असणाऱ्या रागाला सामोरे जाऊ शकत नाही. त्यामुळेचं ते भारतामध्ये फूट पाडून द्वेष लपवत आहे. आपण केवळ देशातल्या प्रत्येक भारतीयांविषयी प्रेम व्यक्त करुन नरेंद्र मोदी व अमित शहांचा पराभव करु शकतो'.


देशातल्या वेगवेगळ्या राज्यात नागरिकत्त्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन छेडण्यात आलं. या आंदोलनात तरूणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. दिल्लीत विद्यार्थ्यांनी काढलेल्या आंदोलनानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले.


गेल्या काही दिवसांपासून देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच लोकांशी बोलले. नरेंद्र मोदी म्हणाले की, आंदोलनांद्वारे तुम्हाला विरोध करायचाच असेल तर तुम्ही माझे पुतळे जाळून आंदोलन करा, पण हिंसाचार, शाकीय मालमत्तेची हानी तसेच गरिबांची वाहने जाळू नका, असे आवाहन मोदींनी केले. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या सभेत मोदी बोलत होते.

संबंधित बातम्या
CAA Protest | माझे पुतळे जाळा, पण गरिबांची वाहनं जाळू नका : नरेंद्र मोदी