Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या वतीन यशवंत सिन्हा  (Yashwant sinha) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विरोधी पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षांनी एकत्र येत आपली एकजूट असल्याचे दाखवले. दरम्यान, सत्ताधारी भाजपकडून राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी 24 जूनला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर यशवंत सिन्हा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.


या नेत्यांची उपस्थिती


यशवंत सिन्हा यांनी आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विरोधी पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी राष्टरवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव उपस्थित होते. तसेच काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी, फारुक अब्दुल्ला, ए राजा, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव उपस्थित होते.


दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीएकडे संख्याबळ खूपच कमी आहे. मात्र, आपल्या उमेदवाराला कमी लेखण्याची चूक होता कामा नये, असा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. सध्या एनडीएचं पारडं जड दिसत आहे. कारण, एनडीएकडे एकूण 5.26 लाख मते आहेत, जी एकूण मतांच्या सुमारे 49 टक्के आहेत. एनडीएला विजयासाठी एक टक्का मतांची गरज आहे. दुसऱ्या पक्षाच्या पाठिंब्यानं ते शक्य होऊ शकते. 


यशवंत सिन्हा यांची राजकीय कारकीर्द


यशवंत सिन्हा यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1937 रोजी बिहारमधील पाटणा येथील सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर 1960 पर्यंत पाटणा विद्यापीठात शिक्षक म्हणून काम केले. पाटणा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांना प्रशासकीय सेवेत रुजू होण्याची इच्छा होती. त्यामुळे या काळात त्यांनी आयएएसची तयारी सुरू ठेवली. 1960 मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली. त्यांनी 24 वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. यादरम्यान त्यांनी बिहार सरकारच्या वित्त मंत्रालयात सचिव आणि उपसचिव म्हणून दोन वर्षे काम केले. यानंतर त्यांची भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात उपसचिव पदावर नियुक्ती झाली. यशवंत सिन्हा यांनी त्यांच्या कार्यकाळात भारतीय दूतावासातील महत्त्वाची जबाबदारीही सांभाळली. 1971 ते 1974 या काळात त्यांची जर्मनीतील भारतीय दूतावासाचे प्रथम सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.


1986 मध्ये जनता पक्षात प्रवेश


तब्बल अडीच दशके भारतीय प्रशासकीय सेवेत राहिल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजकारणात प्रवेश पाऊल ठेवलं. 1986 मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना पक्षाचे सरचिटणीसपद देण्यात आले. 1988 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले. पुढे 1989 मध्ये त्यांच्या पक्षाची जनता दलाशी युती झाल्यानंतर त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवण्यात आले. 1990-91 मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्रीपदही भूषवले होते. त्यानंतर 1998 ते 2002 पर्यंत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. 2002 मध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे पदही भूषवले होते. यशवंत सिन्हा यांनी 2009 मध्ये भाजपच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 2018 मध्ये भाजप सोडल्यानंतर ते 2021 मध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील TMC मध्ये सामील झाले.