नवी दिल्ली: अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारणीसाठी रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा करण्याच्या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या वर्गणी अभियानाची सुरवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून झाली असून मंदिराच्या उभारणीसाठी राष्ट्रपतींनी पाच लाखांचा चेक ट्रस्टकडे सोपवला आहे.


राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेने या वर्गणी अभियानाला सुरुवात केली आहे. हे अभियाने पुढचे दिड महिना चालेल असं सांगण्यात येतंय. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातल्या 13 कोटी कुटुंबापर्यंत पोहचण्याचं लक्ष आहे.


श्रीराम मंदिर निधी संकलनाच्या आडून राज्यात भाजपच संपर्क अभियान?


या वर्गणी अभियानातून जमा झालेल्या वर्गणीतून अयोध्येत भव्य असे राम मंदिर उभारण्याचा मानस ट्रस्टच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे. या अभियानात 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपये अशा स्वरुपात वर्गणी गोळा करण्यात येत असून वर्गणी दिलेल्यांना त्याची पावती तसेच मंदिर आणि भगवान रामाचे एक चित्र देण्यात येणार आहे.


दोन हजारापेक्षा जास्त वर्गणी देणाऱ्या लोकांसाठी वेगळी पावती देण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून संबंधित देणगीदारांना आयकरापासून सूट मिळेल असे ट्रस्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी सांगितलं की राष्ट्रपतींच्या हस्ते या अभियानाची सुरवात केल्यानंतर आता उपराष्ट्रपतींचीही भेट घेण्यात येणार आहे. हे अभियान पंतप्रधानांपासून ते देशातील कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं.


Ram Mandir Construction: अयोध्येतील राममंदिरासाठी वर्गणी की राजकीय प्रचार? भाजप-शिवसेना पुन्हा आमने-सामने


अयोध्येतील राममंदिराचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं. त्यानंतर आता राममंदिराच्या उभारणीसाठी वर्गणी अभियानाला सुरुवात झाली आहे. राममंदिर उभारणीसाठी क्राऊड फंडिंगद्वारे (लोकांकडून वर्गणी काढून) 10 अब्ज रुपये जमा करण्याचा विचार विश्वहिंदू परिषदेने या आधीच व्यक्त केला होता. राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले असून मंदिर 1000 वर्ष टिकावे या दृष्टिकोनातून दगड आणि तांब्याचा उपयोग करत ते बांधले जाणार आहे अशीही माहिती मिळते.


जेव्हा राम मंदिरासाठी शिलादान झाले होते, त्यावेळी 3 लाख गावातून पूजन करत शीला अयोध्येत पोहचल्या होत्या. तेव्हा विश्व हिंदू परिषदेने 1 व्यक्ती सव्वा रुपया आणि एक गाव, एक वीट असे ध्येय ठेवले होते.


Ram Mandir | राममंदिर उभारणीसाठी 10 अब्ज रुपयांचा निधी गोळा करणार, विश्व हिंदू परिषदेचा संकल्प