Tiger Reserve Forest:  एका बाजूला सरकार, स्वयंसेवी संस्थांकडून वाघांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्प (Tiger Reserve Forest Project) शिकाऱ्यांच्या निशाण्यावर आले आहे. राज्याला केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबासह पेंच, मेळघाट आणि गडचिरोली जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आसाम मध्ये एका वाघाची कातडी जप्त कऱण्यात आली होती आणि ही कातडी मध्यभारतातील वाघाची असल्याचा संशय आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील ताडोबासह पेंच, मेळघाट, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे. 


मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्प सध्या शिकाऱ्यांच्या रडारवर असून  महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याला केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात एका वाघाची शिकार झाल्याचं उघड झाल्याने वनविभागाच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.


मध्य भारतातील वाघ पुन्हा एकदा शिकाऱ्यांच्या रडारवर आहेत. वर्ष 2011 ते 2016 या काळात मध्य भारतात वाघांच्या शिकारीच्या अनेक घटना उघडकीस आल्या. बहेलिया गॅंगने तर त्या काळात मध्य भारतात अगदी उच्छाद मांडला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा, नागपूर जिल्ह्यातील पेंच आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक वाघांची या टोळीने शिकार केली. मात्र, गेल्या काही वर्षात वनविभागाने मोठ्या प्रयत्नाने हे नेटवर्क उद्धवस्त केलं. मात्र काही दिवसांपूर्वी आसाममध्ये एका वाघाची कातडी जप्त कऱण्यात आली आणि केंद्रीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.


केंद्रीय यंत्रणेने महाराष्ट्रातील ताडोबासह पेंच, मेळघाट, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रासोबतच मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याला देखील संशयित शिकाऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, हा अलर्ट असतानाच छत्तीसगड राज्याच्या बिजापूर येथे वाघाच्या कातडीसह काही लोकांना अटक करण्यात आली. मुख्य म्हणजे हा वाघ गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा जंगलातून शिकार करून मारण्यात आला होता.


एकीकडे व्याघ्र प्रकल्पांना देण्यात आलेला रेड अलर्ट आणि त्याच वेळी उघडकीस आलेली वाघाच्या शिकारीची घटना हे काही कमी होतं की काय म्हणून वनविभागाची चिंता वाढवणारी आणखी एक घटना पुढे आली. वाघांची संख्या वाढावी आणि पर्यटनाला चालना मिळावी या हेतूने चंद्रपूर जिल्ह्यातील दोन वाघिणी काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आल्या होत्या. मात्र यातील एक वाघीण मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात दाखल झाली असून त्या वाघिणीने तीन जनावरांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.


मध्य भारत हा वाघांच्या संख्या वाढीच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट समजला जातो. मात्र दोन वाघांची झालेली शिकार आणि वाघांच्या पुर्नवसनाचा फसलेला प्रयत्न वनविभागाच्या दृष्टीने चिंता वाढविणारा आहे.