नवी दिल्ली : पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या कुरापतींना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पाक सेनेच्या एलओसीला लागून असलेल्या नौशेरा सेक्टरमधील पाकच्या चौक्या भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केल्या आहेत. पाकिस्तानने मात्र नेहमीप्रमाणेच रडीचा डाव खेळत हे दावे खोटे असल्याचा प्रतिदावा केला आहे.


भारतीय सेनेने पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईचा व्हिडिओ जारी केला आहे. 30 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एकामागून एक असे बॉम्बस्फोट होताना दिसत आहेत. पाकने मात्र ढळढळीत पुरावे समोर
असतानाही भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

पाकिस्तानी लष्कराकडून मेजर जनरल आसिफ गफूर यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. पाकिस्तानच्या एलओसीजवळ नौशेरा सेक्टरमध्ये असलेल्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा आणि पाकिस्तानी सैन्याकडून
सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार झाल्याचा दावा भारतीय करत आहेत. मात्र हे खोटं आहे, असं आसिफ
गफूर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

https://twitter.com/OfficialDGISPR/status/866972917078392833

सप्टेंबर 2016 मध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या वेळीही पाकिस्तानने कारवाईचं वृत्त उडवून लावलं होतं. पाकिस्तानी सैन्य आणि सरकारने पुन्हा-पुन्हा इन्कार करुनही सत्य लपलं नाही.

घुसखोरीविरोधात भारताचा करारा जवाब, पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त


भारतील सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल अशोक नरुला यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. पाकिस्तानचं लष्कर घुसखोरीसाठी दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा दावाही भारताने केला आहे. बर्फ वितळल्याने आणि पास खुले झाल्याने घुसखोरीचं प्रमाण वाढल्याचं शक्यता आहे, असंही अशोक नरुला म्हणाले.

30 सेकंदात पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त

9 मेच्या कारवाईचा हा व्हिडीओ आहे. 30 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या चौक्या भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केल्याचं दिसत आहे.

रॉकेट लॉन्चर, अँटी टँक गायडेड मिसाईल, 106 रिकॉल गन आणि ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चरच्या सहाय्याने भारतीय सैन्याने ही कारवाई केली.

‘ही कारवाई दहशतवादविरोधी अभियानाचा भाग’

नरुला म्हणाले की, शेजारच्या देशाने सीमेवरील घुसखोरी थांबवावी. आम्ही नुकतीच नौशेरामध्ये जी कारवाई केली ती घुसखोरीविरोधात होती. ही कारवाई आमच्या दहशतवादविरोधी अभियानाचा भाग आहे. काश्मिरमध्ये आम्हाला शांतता हवी आहे. यासाठी सीमेवरील घुसखोरी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरुन दहशतवाद्यांची संख्या कमी होईल आणि राज्यातील तरुणाई चुकीच्या मार्गाला जाऊ नयेत. दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सीमेवर अशाप्रकारची कारवाई करतच असतो.

भारताने उरी हल्ल्याच्या 11 दिवसांनंतर मागील वर्षी 29 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेकी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता, ज्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.

18 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सैन्याच्या कॅम्पवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते.

पाहा व्हिडीओ