रावळपिंडी : भारतासोबत मैत्रीपूर्ण संबध प्रस्थापित करण्याच्या बाता मारणाऱ्या पाकिस्तानाचा खरा चेहरा पुन्हा समोर आला. पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवांनी भारताला धमकी दिली आहे. 'पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू' अशा शब्दात पाक लष्करप्रमुखांनी गरळ ओकली आहे.


"पाकिस्तानच्या सीमेवर ज्या जवानांनी आपलं रक्त सांडवलं आणि देशासाठी आपले प्राण गमावले, त्या सर्वाचा हिशेब चुकता करणार", असा पवित्रा पाक लष्करप्रमुखांनी घेतला आहे. काल 6 सप्टेंबरला पाकिस्तानचा सीमा सुरक्षा दिवस होता. त्यानिमित्तानं रावळपिंडीतील सैन्य मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा बोलत होते.


या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील उपस्थित होते. शिवाय पाकिस्तानी सैन्यानं देशावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी शहीदत्व स्वीकारुन देशाचं रक्षण केलं आहे. जगभरात मागील काही वर्षांपासून दहशतवादानं खळबळ माजवलीय. त्यातून पाकिस्तानही सुटला नाही. पाक जनतेच्या घरात, शाळांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. तरी, पाकिस्तानी सैन्य दहशतवादाशी लढण्यास सज्ज आहे, असं पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणाले.


1965 आणि 1971 सालच्या युद्धातूनही पाक लष्कर अनेक गोष्टी शिकल्याचंही त्यांनी उपस्थितांसमोर मान्य केलं.


दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही
लष्करप्रमुख कमर जावेद बाजवांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांची भारत निती समोर आली आहे. मात्र भारत शांतीच्या मार्गावर एकचा चालू शकत नाही, असं मोदींनी याआधीच स्पष्ट केलं आहे. पाकिस्ताननेही सोबत आलं पाहिले. तसेच दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही हे भारताने आधीच स्पष्ट केलं आहे.