नवी दिल्ली : भारतात प्रत्येकी चारपैकी एक कारचालक सीटबेल्ट वापरतो, असं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. दक्षिण भारतात सीटबेल्टचा वापर सर्वात कमी केला जातो. तर 81 टक्के महिला सीटबेल्ट वापरतात, पुरुषांमध्ये हे प्रमाण 68 टक्के आहे, असं मारुती सुझुकीने केलेल्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.


'भारतातील सीटबेल्टचा वापर' हा सर्व्हे मारुती सुझुकीने केला. 17 शहरांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात 2500 चालक आणि प्रवाशांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःहून सीटबेल्ट वापरणारांचं प्रमाण खुप कमी आहे. पोलिसांच्या भीतीपोटी सीटबेल्ट वापरणाऱ्यांची संख्या 80 टक्के आहे.

नागपुरात 90 टक्के, तर चंदीगड आणि जयपूरमध्ये 80 टक्के वाहन चालक सीटबेल्ट वापरतात. त्यानंतर मुंबईमध्ये सर्वाधिक 78 टक्के चालक सीटबेल्टचा वापर करतात, असं सर्व्हेमध्ये म्हटलं आहे.

एका अहवालानुसार, 2016 मध्ये दररोज 15 जणांचा मृत्यू हा सीटबेल्ट न वापरल्यामुळे झाला आहे. सीटबेल्ट वापरल्यामुळे अपघातात मृत्यूची शक्यता 45 टक्क्यांनी कमी होते. तर गंभीर जखमी होण्याचा धोका 50 टक्क्यांनी कमी होतो, असं अहवालात म्हटलेलं आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे तामिळनाडूतील प्रसिद्ध शहर कोयम्बतूरमध्ये सर्वेक्षणातील एकानेही सीट बेल्ट वापरत नसल्याचं सांगितलं.

राजधानी दिल्लीमध्ये नियमांच्या कडक अंमलबजावणीमुळे सीट बेल्ट वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर शेजारच्या मेरठमध्ये सीट बेल्ट वापरणारे दिल्लीपेक्षा जास्त आहेत. सीट बेल्ट वापरणाऱ्यांच्या बाबतीत दक्षिणेतील शहरांची रँक सर्वात खराब आहे. त्यानंतर पूर्वेकडील शहरांचा (79 टक्के) नंबर लागतो.

पुढच्या सीटवर बसणाऱ्या केवळ 4 टक्के प्रवाशांकडून सीट बेल्ट वापरला जातो. सीट बेल्ट न वापरण्याचं सर्वाधिक प्रमाण एसयूव्हीमध्ये आहे. सीट बेल्ट लावलेला नसेल तर एअरबॅगचा उपयोग शून्य आहे, असं मारुती सुझुकीचे संशोधन आणि विकास विभाग प्रमुख सी. व्ही. रमन यांनी म्हटलं आहे. सीट बेल्ट न वापरण्यासाठी काही क्षुल्लक कारणं दिल्याचंही सर्व्हेमधून समोर आलं. 25 टक्के वाहन चालक कपडे खराब होऊ नये, म्हणून सीट बेल्ट वापरत नाहीत.