मुंबई : भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. अभिजीत बॅनर्जी यांना गरिबी निर्मूलनाच्या संशोधनासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अभिजीत बॅनर्जी यांच्यासोबत एस्थर डुफलो आणि मायकल क्रेमर यांनाही नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याआधी कोणत्या भारतीयांचा नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे, यावर एक नजर टाकूया.




रविंद्रनाथ टागोर (1913)


कवी, साहित्यिक आणि राष्ट्रगीत 'जन गन मन' लिहिणारे रविंद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नोबेल पुरस्काराने गौरव झालेले ते पहिले भारतीय होते.


सी व्ही रमन (1930)


रविंद्रनाथ टागोर यांच्यानंतर तब्बल 17 वर्षांनी सी व्ही रमन यांच्या रुपाने भारताला नोबेल पारितोषिक मिळालं. भौतकशास्त्रातील कामगिरीबद्दल सी व्ही रमन यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग संशोधनासाठी त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला.


हरगोविंद खुराना (1968)


भारतीय वंशाचे अमेरिकन हरगोविंद खुराना यांना वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. जेनेटिक कोडची समीक्षा आणि प्रोटिन सिंथेसिसमधील कार्य यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला होता.


मदर टेरेसा (1979)


मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि रोमन कॅथलिक नन मदर टेरेसा यांना 1979 मध्ये शांतीचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं.


सुब्रमण्यम चंद्रशेखर (1983)


भारतीय वंशाचे अमेरिकन सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचा विलियम ए फॉलर यांच्यासोबत भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलं होतं. सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे बटू तारे यांचे अस्तित्त्व कशामुळे टिकून आहे, यावरील संशोधनासाठी त्यांचा नोबेल पारितोषकाने गौरवण्यात आलं होतं.


अमर्त्य सेन (1998)


अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्या कल्याणकारी अर्थशास्त्राची दिशा यामधील प्रयत्नांसाठी त्यांना 1998 साली नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला.


वेंकटरमण रामकृष्णन (2009)


रसायनशास्त्रातील कार्याबद्दल वेंकटरमण रामकृष्णन यांचा 2009 साली नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला. राइबोसोमची रचना यावरील संशोधनासाठी इतर दोन वैज्ञानिकांसोबत वेंकटरमण रामकृष्णन यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं.


कैलास सत्यर्थी (2014)


बाल अधिकारांसाठी काम करणारे आणि बचपन बचाओ आंदोलनचे संस्थापक कैलास सत्यार्थी यांचा शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सत्यार्थी यांच्यासोबत पाकिस्तानची बाल अधिकार कार्यकर्ता मलाला युसूफजई यांचाही नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.