नवी दिल्ली :  देशभरात 12  सप्टेंबर रोजी एनटीए (नेशनल टेस्टिंग एजन्सी) द्वारे मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 16 लाख विद्यार्थी ज्यांनी ही परीक्षा दिली होती ते विद्यार्थी मागील काही दिवसांपासून परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार ? याची वाट बघत होते. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी ला नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत हिरवा कंदील दिल्यानंतर  अखेर हा निकाल आज जाहीर झाला आहे.


वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा  NEET UG परीक्षा आता पहिल्यांदाच हिंदी, मराठी, पंजाबी, आसामी, बंगाली, उडिया, गुजराती, तेलुगु, मल्याळम, कन्नड, तामिळ, उर्दू आणि इंग्रजी अशा तेरा भाषांमध्ये आयोजित करण्यात आली.  यापूर्वी कोविड साथीच्या आजारामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या परीक्षा 12 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आली. 


नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यार्थ्यांच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर नीट यूजी (NEET UG)चे निकाल पाठवले आहे. अंडरग्रॅज्युएट मेडिकलच्या विद्यार्थी अनेक दिवसांपासून निकालाची वाट बघत होते. नीटचा निकाल त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर  https://neet.nta.nic.in   जाहीर करण्यात आला आहे


NEET च्या निकालानंतर मेडिकल काउंसलिंग कमिटी (MCC)आणि काउंसलिंग बॉडी ऑल इंडिया कोटा आणि राज्य कोटा अंतर्गत मेडिकल प्रवेशासाठी सुरूवात होईल. या विषयी अधिक माहितीसाछी मेडिकल काउंसलिंग कमिटीच्या https://mcc.nic.in   संकेतस्थळाला भेट द्यावी. एनटीएने ऑक्टोबर महिन्यात प्रिलिमिनरी अन्सर की (preliminary answer key) जारी केली. या द्वारे विद्यार्थ्यांना आपल्या गुणांचा अंदाज लावण्यास मदत होते. 


निकालास उशीर का झाला?


उत्तरपत्रिकेत त्रुटी असल्याचं सांगत दोन विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती.  हायकोर्टानं दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेनंतर नीट निकाल थांबवला होता.  त्यानंतर सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, दोन विद्यार्थ्यांसाठी आम्ही निकाल थांबवू शकत नाही. 16 लाख विद्यार्थी निकालाची वाट पाहात आहेत. कोर्टानं याचिका दाखल केलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मुद्यावर NTAला नोटिस जारी केली. हा निकाल लागण्यास होत असलेल्या उशीरामुळं एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस अशा मेडिकल पाठ्यक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला उशीर होणार आहे.  याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की, त्यांना देण्यात आलेली टेस्ट बुकलेट आणि अन्सर बुकलेट मॅच करत नव्हती. या उमेदवारांनी तत्काळा निरीक्षकांच्या समोर हा मुद्दा मांडला. त्यावेळी त्यांचं म्हणणं ऐकूनही घेतलं नाही. कोर्टानं एनटीएला याचिकाकर्ता वैष्णवी भोपाले आणि अभिषेक कापसे यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचं सांगत दोन आठवड्यात त्यांचा निकाल घोषित करण्याचं सांगितलं होते.