मुंबई : पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे एनडीटीव्हीचे मॅनेजिंग एडिटर रवीश कुमार यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. हिंदी टीव्ही पत्रकारितेत योगदानासाठी रवीश कुमार यांना हा पुरस्कार मिळाला आहे. अरुण शौरी, पी साईनाथ यांच्यानंतर रवीश कुमार यांच्या रुपाने आणखी एका भारतीय पत्रकाराचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे.


यंदा हा पुरस्कार मिळवणाऱ्या पाच जणांमध्ये रवीश कुमार एकमेव भारतीय आहेत. रवीश कुमार यांच्यासह म्यानमारचे को सी विन, थायलंडच्या अंगहाना नीलपायजित, फिलिपाईन्सचे रमेंड आणि दक्षिण कोरियाचे किम जोंग यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रवीश कुमार यांना हा पुरस्कार पत्रकारितेत वंचितांचा आवाज बुलंद करण्यासाठी दिला जात असल्याचं रॅमन मॅगसेसे कमिटीच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. रवीश कुमार यांचा कार्यक्रम 'प्राईम टाईम' हा जीवनातील खरे मुद्दे आणि सामन्यांच्या अडचणींवर भाष्य करतो, असं रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाऊंडेशनने म्हटलं आहे.


काय आहे रॅमन मॅगसेसे पुरस्कार?
'रॅमन मॅगसेसे'ला आशियाचा नोबेल पुरस्कारही म्हटलं जातं. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आशियातील व्यक्ती आणि संस्थांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान केला जातो. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार शासकीय सेवा, सार्वजनिक सेवा, सामूहिक नेतृत्त्व, पत्रकारिता तसंच साहित्य, शांतता आणि उदयोन्मुख नेतृत्त्व या सहा श्रेणींमध्ये देण्यात येतो.

या भारतीयांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार
रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे आचार्य विनोबा भावे हे पहिले भारतीय होते. 1958 मध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यानंतर मदर तेरेसा (1962), जयप्रकाश नारायण (1965), सत्यजीत रे (1967), चंदी प्रसाद भट्ट (1982), अरुण शौरी (1982), किरण बेदी (1994), अरविंद केजरीवाल (2006), पी साईनाथ (2007) यांचाही प्रतिष्ठित रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरव केला आहे.