Parliament Monsoon Session: संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Parliament) सुरू असून विरोधकांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणला आहे. त्यावर मंगळवारपासून संसदेत चर्चा सुरू झाली. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, संसदेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) लोकसभेत बोलताना राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार अरविंद सावंत यांना खाली बसण्यास सांगताना नारायण राणेंची जीभ घसरली. 


विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास चर्चेदरम्यान अरविंद सावंत यांना बोलताना नारायण राणेंना राग अनावर झाला. ते म्हणाले, "अरे नीचे बैठ." नारायण राणेंचं वक्तव्य ऐकताच लोकसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप केला. त्यावेळी नारायण राणे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात बोलण्याची अरविंद सावंत यांची लायकी (औकात) नाही. 


लोकसभेत नारायण राणे म्हणाले, "औकात नही है"


नारायण राणे लोकसभेत बोलताना म्हणाले की, "लायकी नाही यांची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांबाबत बोलायची... जर काहीही बोललास तर तुमची लायकी मी काढीन. जर तुम्ही काही बोललात, तर मी तुम्हाला तुमची जागा दाखवीन." लोकसभेतील नारायण राणे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, नारायण राणे यांच्यावर संसदेत अरविंद सावंत यांच्यावर टीका करताना उद्गारलेल्या शब्दांमुळे टीकेची झोड उठली. 






आम आदमी पार्टीच नारायण राणेंच्या वक्तव्यावर ट्वीट 


नारायण राणे यांच्या लोकसभेतील वक्तव्यानंतर आम आदमी पार्टीनं म्हटलं की, "पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यानं रस्त्यावरच्या गुंडाप्रमाणे भाषेचा वापर करत संसदेच्या आत धमकी दिली आणि तरिदेखील ते वाचले, दुसरीकडे विरोधी पक्षांच्या एका खासदाराला मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे.


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिलंय की, "ही व्यक्ती एक मंत्री आहे. इथे ही व्यक्ती या सरकारचा दर्जा दाखवत आहे आणि ते किती खालच्या पातळीवर जाऊ शकतं."


अरविंद सावंत काय म्हणालेले? 


शिवसेनेतून बंडखोरी करुन बाहेर पडलेल्या खासदारांवर निशाणा साधताना अरविंद सावंत म्हणाले होते की, "तेव्हा पंतप्रधान मोदी 36 सेकंदांसाठी बोलले होते... ते आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत आणि आम्ही हिंदुत्वासोबत जन्माला आलोय. जे हिंदुत्वाचं पालन करतात ते पक्ष सोडत नाहीत. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीला 'नॅशनल करप्ट पार्टी' म्हटलं आणि त्यानंतर राष्ट्रवादीतील काही आमदार सरकारमध्ये सहभागी झाले."