Mann Ki Baat : भारतासाठी मोठी संधी, 2023 च्या G20 परिषदेत तरुणांनी सामील व्हा; पंतप्रधानांचं आवाहन
Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात'द्वारे जनसंबोधन केलं. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, जी20 परिषद ही भारतासाठी मोठी संधी आहे.
PM Modi Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज 'मन की बात'द्वारे जनसंबोधन केलं. 'मन की बात'चा 95 वा भाग प्रसारित करण्यात आला आहे. यावेळी 'मन की बात'मध्ये पंतप्रधानांनी जी20 शिखर संमेलनाचा (G-20 Summit) उल्लेख केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी देशातील तरुणांना जी20 शिखर परिषदेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. 2023 मध्ये होणाऱ्या G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील विणकर येल्दी हरिप्रसाद गरू यांचा विशेष उल्लेख केला. येल्दी हरिप्रसाद गरू यांनी हातांनी विणलेला G-20 लोगो पंतप्रधान मोदी यांना भेट म्हणून पाठवला आहे. येल्दी यांना विणकामाचा वारसा त्याच्या वडिलांकडून मिळाला असून त्यांनी तो चांगल्या रितीने सांभाळल्या आहे. असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी जी20 शिखर परिषदेचा लोगो पाठवल्याबद्दल येल्दी यांचे आभार मानले.
G20 शिखर परिषदेत सहभागी होण्याचं आवाहन
तेलंगणातील एका जिल्ह्यात बसलेला माणूसही G-20 सारख्या शिखराशी किती जोडलेला आहे हे पाहणे चांगलं आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पुण्याचे रहिवासी सुब्बा राव चिल्लारा आणि कोलकाता येथील तुषार जगमोहन यांनी G-20 संदर्भात भारताच्या प्रयत्नांचं खूप कौतुक केलं आहे. पंतप्रधानांनी देशातील तरुणांनाही G20 शिखर परिषदेचा भाग होण्याचं आवाहन केलं आहे.
The Presidency of G20 has arrived as a big opportunity for us. We have to make full use of this opportunity and focus on global good. #MannKiBaat pic.twitter.com/HicnxxNp6m
— PMO India (@PMOIndia) November 27, 2022
2023 च्या G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे
2023 मध्ये होणाऱ्या G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळणार आहे. याभारतात 2023 मधील जी20 परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. 1 डिसेंबरपासून भारत औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. नुकत्याच इंडोनेशियामध्ये 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी 17 वी शिखर परिषद पार पडली आहे. या शिखर परिषदेच्या समारोप सत्रात इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी प्रतीकात्मकपणे G20 चं अध्यक्षपद भारताकडे म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्याकडे सुपूर्द केलं आहे.
G20 शिखर संमेलन काय आहे?
जी-20 शिखर संमेलन हा जगातील वीस मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा समूह आहे. हा समूह जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा आणि स्थिती ठरवतो. G20 शिखर परिषदेदरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेचा अजेंडा निश्चित करण्यात येतो. यामध्ये जगातील आघाडीची अर्थव्यवस्था असणारे 19 देश आणि युरोपियन संघाचा समावेश आहे. जगातील 85 टक्के व्यवसाय फक्त G20 सदस्य देशांमध्ये केला जातो. G-20 देशांमध्ये भारत, ब्रिटन, अमेरिका, चीन, फ्रान्स, जर्मनी, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की आणि युरोपीय संघ यांचा समावेश आहे.