West Bengal chief minister Mamata Banerjee will visit Mumbai : तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ममता बॅनर्जी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मोट बांधण्याच्या दृष्टीने या भेटीचं मोठं महत्व असल्याचं बोललं जात आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.


मंगळवारी ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सांगितलं. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस भाजपविरोधातील मोठा पक्ष असेल, असेही घोष म्हणाले. मुंबई भेटीत ममता बॅनर्जी काही उद्योगपतींसोबतही भेटी घेणार आहे. पश्चिम बंगालमध्ये व्यावसाय वाढीसाठी ही भेट असल्याचे बोललं जात आहे. सुत्रांच्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान दौऱ्यावरही जाणार आहेत. या दौऱ्यात राजस्थानमधील पक्षाची ताकद वाढवण्यावर भर  दिली जाणार जाईल. गोवा,  मेघालय, त्रिपुरा आणि आसाममध्येही निवडणुकीत लढण्याचा निर्णय ममता बॅनर्जींनी घेतलाय.  


ऑगस्ट महिन्यात ममतांनी पहिला मोठा दिल्ली दौरा आखला. त्यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट टाळली होती. विशेष म्हणजे संसद अधिवेशनाच्या निमित्तानं त्यावेळी शरद पवार दिल्लीत होते. पण त्यावेळी अरविंद केजरीवाल, कनिमोळी यांची भेट घेणाऱ्या ममतांनी पवारांची मात्र भेट घेतली नव्हती. तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वासाठी पवारांचंही नाव असतं. या पार्श्वभूमीवर या दोघांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे. ममता मुंबईसोबतच मोदींच्या वाराणसीवरही लक्ष ठेवून आहेत. लवकरच आपण वाराणसीत जाणार असल्याचं ममतांनी घोषित केलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला मदत करायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ममतांप्रमाणेच केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही विस्ताराची मोठी योजना आखतोय. केजरीवाल गोवा, पंजाब, उत्तराखंड, गुजरात या राज्यांमध्ये विस्ताराची मोठी योजना आखत आहेत. त्यामुळे आता 2024 च्या या शर्यतीत नेमकं कोण पुढे येणार आणि कोण भाजपला टक्कर देऊ शकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


संबधित बातम्या : 
Mamata Banerjee : प्रत्येकवेळी सोनियांना भेटायची काय गरज? ममतांच्या राष्ट्रीय महत्वकांक्षेनं काँग्रेससोबत संबंध बिघडणार?