मुंबई: भारत आणि मालदीवमधील (Maldives) संबंध आता आणखी बिघडण्याच्या मार्गावर आहेत. मालदीवमधून भारताने आपले सैन्य मागे घ्यावे अशी औपचारिक विनंती आता मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने केली आहे. मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रपती मोहम्मद मुईझू (Mohamed Muizzu) हे चीनी समर्थक असून त्यांनी पहिल्या दिवसापासून भारतविरोधी सूर आळवला आहे.


मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालदीव सरकारने भारताला मालदीवमधून आपले लष्करी कर्मचारी मागे घेण्याची औपचारिक विनंती केली आहे.


हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मालदीवच्या प्रेस रिलीझमध्ये असे म्हटले आहे की राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुईझू यांनी शनिवारी (18 नोव्हेंबर) राष्ट्रपती कार्यालयात भारत सरकारचे मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान औपचारिकपणे ही विनंती केली.


भारतीय लष्करी तळ नको


केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू मालदीवच्या नवीन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले होते. निवडून येण्यापूर्वी मुईझू म्हणाले होते की, मालदीवमधून भारतीय लष्कराची उपस्थिती लवकरात लवकर संपवणे हे त्यांचे पहिले प्राधान्य आहे.


मालदीवचे नवीन राष्ट्रपती चिनी समर्थक


मुईझू यांनी शुक्रवारी (17 नोव्हेंबर) शपथ घेतल्यानंतर म्हटले की, मालदीवच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी देशात कोणतेही परदेशी सैन्य अस्तित्वात नाही याची खात्री करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. चीन समर्थक समजले जाणारे मुईझू हे मालदीवचे आठवे राष्ट्राध्यक्ष आहेत.


भारत मालदीवसोबत सहकार्य आणि भागीदारीसाठी उत्सुक 


तत्पूर्वी, भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अलीकडेच भारत-मालदीव सहकार्यावर भाष्य केले आणि सांगितले की, भारत मालदीवसोबत सतत सहकार्य आणि भागीदारी करण्यास उत्सुक आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आम्ही लोक कल्याण, मानवतावादी मदत, आपत्ती निवारण यासारख्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.


गेल्या पाच वर्षांत आपल्या लष्करी जवानांनी मालदीवमधील 523 लोकांचे प्राण वाचवले आहेत. एवढेच नाही तर गेल्या पाच वर्षांत भारताने मालदीवच्या सागरी सुरक्षेसाठी 450 हून अधिक बहुआयामी मोहिमा केल्या. त्यापैकी 122 मोहिमा गेल्या वर्षी पार पडल्या.


चीन समर्थक राष्ट्रपती भारतासाठी डोकेदुखी


मोहम्मद मुईझू यांनी पहिल्याच भाषणात 'इंडिया आऊट'चा नारा दिला आहे. मुईझू यांनी प्रचारादरम्यानही 'इंडिया आऊट'चा नारा दिला होता. मुईझू हे चीने समर्थक असल्याचं मानलं जातं. ते याआधी माले शहराचे आमदार होते. मुईझू यांची वक्तव्य नेहमी चीनच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळतं. चीनसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे.


ही बातमी वाचा: