Maharashtra, MP top NCRB list of crime against elderly in 2021 : महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक सर्वात कमी सुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती NCRB (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) अहवालातून समोर आली आहे. 2021 मध्ये महाराष्ट्रात 6190 ज्येष्ठ नागरिकांसंबधित गुन्ह्याची नोंद झाली आहे. देशभरात ही संख्या सर्वाधिक आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार देशातील ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्रात सर्वात कमी सुरक्षित आहेत, त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येच्या प्रकरणात तामिळनाडू आघाडीवर असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.

60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारात गेल्या काही वर्षांपासून वाढ होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर मध्यप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो.  2020 मध्ये कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारीचा आलेख ढासळला होता. पण कोरोनानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचं समोर आले आहे. 2019 ते 2021 या तीन वर्षांमध्ये ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या आत्याचारात वाढ झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमाण सर्वाधिक आहे. 

ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारात आघाडीवर असणारे चार राज्य

राज्याचं नाव 2019 2020 2021
महाराष्ट्र 6163 4909 6190
मध्य प्रदेश 4184 4602 5273
तेलंगणा 1523 1575 1952
तामिळनाडू 2509 1581 1841

धक्कादायक बाब म्हणजे, मध्य प्रदेशात ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत, असे एनसीआरबीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांविरोधातील 6,190 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तर या यादीत मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये मध्य प्रदेशमध्ये 5273 गुन्हे घडले ज्यात पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजेच मध्य प्रदेशात दररोज 14 वृद्ध गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत. तेलंगणामध्ये 2021 मध्ये 1952 प्रकरणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तामिळनाडूमध्ये 2021 मध्ये 1841 गुन्ह्यांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. दरम्यान, या बहुतांश घटनांमध्ये पोलिसांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. 

ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येच्या प्रकरणात तामिळनाडू आघाडीवर असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. तामिळनाडूमध्ये  191, महाराष्ट्रात 181, मध्य प्रदेशमध्ये 121 आणि उत्तर प्रदेशध्ये 101 ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येची नोंद झाली आहे.