Cyrus Mistry Dies In Accident : देशातील अत्यंत प्रतिष्ठित टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि प्रतिभाशाली उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा आज कार अपघातात पालघरनजीक मृत्यू झाला. त्यांच्या अकाली मृत्यूने संपूर्ण देश हादरला असून उद्योगजगत शोकसागरात बुडाले आहे. पालघर येथे कार अपघातात मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार सायरस मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला मर्सिडीज कारमधून प्रवास करत होते.


आज दुपारी 3.15 ते 3.30 च्या दरम्यान मुंबईपासून 135 किमी अंतरावर असलेल्या पालघरमधील चारोटी परिसरात कार रस्ता दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला. कार चालकासह त्यांच्यासोबत प्रवास करणारे अन्य दोघे जखमी झाले. सर्व जखमींना गुजरातमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


सायरस मिस्त्री यांची रतन टाटा यांच्यानंतर समूहाचे अध्यक्ष झाले होते. परंतु, नंतर भारतातील सर्वात उच्च-प्रोफाइल बोर्डरूम बैठकीत त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. या अपघातानंतर देशातील रस्ते सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचाही मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघातात मृत्यू झाला होता. 


दरम्यान, आतापर्यंत देशासह जगभरातील अनेक दिग्गजांनी कार अपघातात जीव गमवावा लागला आहे. 


एक नजर टाकूया रस्ते अपघातात जीव गमावलेल्या दिग्गजांच्या नावावर 


प्रिन्सेस डायना (Prncess Diana)


राजकुमारी डायना ब्रिटिश राजघराण्यातील सदस्य होत्या. त्या चार्ल्स, प्रिन्स ऑफ वेल्सची पहिली पत्नी आणि प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी यांची आई होती. डायना यांची सक्रियता आणि ग्लॅमरने त्यांना आंतरराष्ट्रीय आयकॉन बनवले होते. 31 ऑगस्ट 1997 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी पॅरिसमध्ये एका कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. 


पाॅल वाॅकर (Paul Walker)


"फास्ट अँड द फ्युरियस" फेम पाॅल वाॅकरचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला. 30 नोव्हेंबर 2013 मध्ये त्याने वयाच्या 40 व्या वर्षी, कॅलिफोर्नियातील सांता क्लॅरिटा येथे एका कार अपघातात जगाचा निरोप घेतला. कारचा ड्रायव्हर 45 मैल प्रतितासच्या झोनमध्ये 80-90 मैल प्रतितास वेगाने जात असताना त्याचे नियंत्रण सुटले आणि तो एका काँक्रीटच्या लॅम्प पोस्टवर आदळला. (72 किमी प्रतितास झोनमध्ये 137 किमी) "फास्ट अँड द फ्युरियस" मधील अभिनयाने त्याने जगभरात ओळख कमावली होती. 


जसपाल भट्टी (Jaspal Bhatti)


प्रख्यात विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचा कार अपघातामध्ये मृत्यू झाला होता. 25 ऑक्टोबर 2012 मध्ये त्यांचा पंजाबमध्ये मृत्यू झाला. 


कन्नड अभिनेत्री रेखा सिंधू (Rekha Sindhu)


कन्नड टीव्ही अभिनेत्री रेखा सिंधू हिचा चेन्नई-बंगळूर महामार्गावर 5 मे 2017 रोजी एका कार अपघातात मृत्यू झाला. ती इतर तिघांसोबत प्रवास करत असताना त्यांच्या कारला अपघात झाला.


नंदामुरी हरिकृष्ण (Nandamuri Harikrishna)


तेलगू अभिनेते आणि तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) नेते नंदामुरी हरिकृष्ण यांचे 29 ऑगस्ट 2018 रोजी एका कार अपघातात निधन झाले. ते 61 वर्षांचे होते.


यशो सागर (Yasho Sagar)


तेलुगू अभिनेता यशो सागरचे 19 डिसेंबर 2012 रोजी एका कार अपघातात निधन झाले. यशो स्नेहा उल्लाल सोबतच्या 'उल्लासमगा उत्साह' या चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जात होता.


इतर महत्वाच्या बातम्या